पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/४२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाभारतातील समाजकारण
३५
 

 वर्णसंकराविषयी बोलताना एकदा भीष्मांनी युधिष्ठिराला पुढील प्रमाणे आपले मत सांगितले- ब्राह्मणाने चारही वर्णांच्या स्त्रिया कराव्या व क्षत्रियाने तीन वर्णांच्या स्त्रिया कराव्या. पण ब्राह्मणाला ब्राह्मण व क्षत्रिय स्त्रीच्या ठायी जी संतती होईल तीच फक्त ब्राह्मणवर्णाची होय. त्याचप्रमाणे क्षत्रियाला क्षत्रिय व वैश्य स्त्रीपासून जी संतती होईल तीच फक्त क्षत्रियवर्णाची होई. इतर संतती सर्व मातेच्या वर्णाची होईल. (अनुशासन अ. ४८)
 ब्राह्मण किंवा क्षत्रिय वर्ण आणि अन्य वर्णही जन्मामुळे ठरतात व त्यांचे गुण अनुवंशावर अवलंबून असतात, असे हे मत आहे. ज्याच्या ठायी ज्ञान, तप असेल तो ब्राह्मण, ज्याच्या ठायी क्षात्रतेज असेल तो क्षत्रिय असा विचार येथे सांगितलेला नाही. (असा विचारही महाभारतात आहे. त्याविषयीची वचने पुढे द्यावयाची आहेत.) ब्राह्मणत्व, क्षत्रियत्व हे जन्मावरच आहे असे येथे सांगितले आहे.
 कौरवपांडवांच्या युद्धानंतर युधिष्ठिर राज्य सोडून संन्यास घेण्याची इच्छा करू लागला. त्या वेळी त्याला अनेकांनी उपदेश केला. त्यात जन्मतःच तुला संन्यास विहित नाही, तुझा क्षात्रधर्म हा जन्मतःच ठरलेला आहे असे अनेक वेळा सांगितलेले आहे. अर्जुन म्हणाला, "प्राण्यांचे कर्म दैवानेच निर्माण करून ठेवलेले आहे. हे राजेन्द्रा ईश्वराने तुला ज्या प्रकारचा जन्म दिला आहे त्याप्रमाणेच तू वागले पाहिजेस.
 भीष्म युधिष्ठिराला राज्य करण्याचा उपदेश करताना हेच म्हणाले-

दानमध्ययनं यज्ञं प्रजानां परिपालनम्
धर्म्यमेतदधर्म्य वा जन्मनैवाभ्यजायथाः ।

-शां. ७५,२६