पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/५१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४४
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

 मात्र वर्णसंकराची आपल्या मनात जी कल्पना रूढ आहे ती त्यांच्या मनांत नव्हती. त्यांना फक्त प्रतिलोम संकराची भीती वाटत होती. म्हणजे ब्राह्मणाने क्षत्रिय, वैश्य व शूद्र स्त्रीशी, क्षत्रियाने वैश्य व शूद्र स्त्रीशी, वैश्याने शूद्र स्त्रीशी विवाह करण्यास त्यांची हरकत नव्हती. पण क्षत्रिय पुरुष व ब्राह्मण स्त्री, वैश्य पुरुष व ब्राह्मण किंवा क्षत्रिय स्त्री व शूद्र पुरुष व ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य स्त्री असे विवाह त्यांना मान्य नव्हते. फक्त जातीतच लग्ने झाली पाहिजेत असा आजचा दंडक तेव्हा नव्हता.
 आता गुण हे जर रक्तावरच अवलंबून आहेत असे असेल तर क्षत्रियाचे अंगी ब्राह्मणाचे गुण का दिसावे, शूद्राचे अंगी केव्हा केव्हा ब्राह्मणाचे सत्य, अहिंसादी गुण किंवा क्षत्रियाचे शौर्य, साहस हे गुण दिसतात त्याचे काय, असा प्रश्न त्यांच्यापुढे वारंवार येत असला पाहिजे. आणि असे गुण दिसले तर त्यांना ब्राह्मण किंवा क्षत्रिय म्हणावे असे त्यांनी उत्तर दिले. पण त्यामुळे समाजव्यवस्था बदलावी असे वाटण्याइतपत त्या मताला दृढता आहे असे त्यांना वाटले नाही.
 भारतीय तत्त्ववेत्त्यांनी जन्मसिद्ध चातुर्वर्ण्य जमेस धरुन समाजव्यवस्था केली हे जरी खरे असले तरी अशा व्यवस्थेमुळे उत्पन्न होणारे जे दोष ते समाजव्यवस्थेत शिरू न देण्याचे त्यांनी आटोकाट प्रयत्न केले होते. आणि यातच त्यांचे वैशिष्ट्य दिसून येते. त्यांनी वर्ण जन्मसिद्ध मानला तरी योग्यता मात्र जन्मावर कधीही अवलंबून ठेवावयाची नाही असे त्यांचे निश्चित मत होते. क्षत्रियकुळात पुरुष जन्माला आला म्हणून तो क्षत्रिय असे धरून त्याने युद्ध, प्रजापालन ही कार्ये करावी असे त्यांनी सांगितले आहे. पण ही कार्ये त्याने न केली तरी केवळ जन्मामुळे त्याला