पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/६०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाभारतातील समाजकारण
५३
 

यदि ह्यसौ भगवान् नाहनिष्यत्
रिपून् सर्वान् असुरान् अप्रमेयः ।
नच ब्रह्मा नैव लोकादिकर्ता
सन्तो धर्माश्चादिधर्माश्च न स्युः ।

- शां. ६४. २३

 जर त्या अप्रमेय अशा विष्णूने शत्रूंचा वध केला नसता तर, ब्राह्मण जिवंत राहिले नसते, लोक राहिले नसते, आदिकर्ता भगवान ब्रह्मदेवही शिल्लक राहिला नसता, हा धर्म राहिला नसता व सनातन आर्यधर्मही राहिला नसता.

नष्टा धर्माः शतधा शाश्वतास्ते
क्षात्रेण धर्मेण पुनः प्रवृद्धाः
युगे युगे ह्यादिधर्माः प्रवृत्ता
लोकज्येष्ठं क्षात्रधर्मे वदन्ति ।

-शां. ६४. २४

 शाश्वत अशा धर्माचा शेकडो वेळा लोप झालेला आहे. पण क्षात्रधर्माच्या योगाने पुनरपि त्याची अभिवृद्धी झाली. हे आदिधर्म प्रत्येक युगात प्रवृत्त होतात. पण क्षात्रधर्म हाच सर्व लोकात श्रेष्ठ धर्म होय.
 ब्राह्मण, वैश्य व शूद्र हे आपापल्या धर्मापासून च्युत झाले तर त्यांना स्वधर्माचे ठायी आणून ठेवणे हे क्षत्रियांचे कर्तव्य आहे. म्हणूनच राजधर्म हाच सर्वांत श्रेष्ठ होय. इतर कोणताही नाही. –(शां. ६५.१२)
 अत्री व गौतम यांच्या वादाचा निर्णय देताना सनत्कुमाराने पुढीलप्रमाणे विवेचन केले आहे :