पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/६१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५४
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

 'राजा हाच सुप्रसिद्ध असा धर्म असून तोच प्रजापती, इंद्र, शुक्र, जगताचे पोषण करणारा धाता आणि बृहस्पती आहे. राजा धर्माचा प्रवर्तक असल्यामुळे सर्वांस मुख्यत्वेकरून कारणीभूत आहे, म्हणूनच त्याला पुरायोनी म्हणजे प्राथमिक कारण असे म्हणतात. ज्याप्रमाणे आकाशदेवतांमध्ये वास्तव्य करणारा सूर्य अंधकाराचा नाश करतो, त्याप्रमाणे भूमीवर वास्तव्य करणारा नरपती हा अधर्माचा अत्यंत नाश करतो. यामुळे व शास्त्र प्रामाण्यावरूनही राजाला प्राधान्य आहे, असे सिद्ध होते. (वन १८५)
 अशा या क्षात्रधर्माची लक्षणे कोणती ?
 इंद्र म्हणतो-

आत्मत्यागः सर्वभूतानुकम्पा
लोकज्ञानं पालनं मोक्षणंच
विषण्णानां मोक्षणं पीडितानां
क्षात्रे धर्मे विद्यते पार्थिवानाम् ।

- शां. ६४. २६

 सर्व प्राणिमात्राविषयी अनुकम्पा, स्वार्थत्याग, राष्ट्राविषयी पूर्ण ज्ञान, लोकांचे पालन, संकटग्रस्तांना मुक्त करणे, गांजलेल्यांची पीडा दूर करणे ही क्षात्रधर्मनिष्ठ राजाची कर्तव्ये होत.
 क्षात्रधर्म हा असा थोर पण तितकाच कठीण असल्यामुळे 'तुझा देह कष्टासाठी आहे' हे जसे ब्राह्मणाला वेदव्यासांनी बजाविले आहे (शां. ३२१. २३), त्याचप्रमाणे ब्रह्मवेत्ता उतथ्य याने क्षत्रियांनाही

धर्माय राजा भवति न कामकरणाय तु । शांति ९०.३

 राजाची- क्षत्रियांची- उत्पत्ती धर्मरक्षणासाठी आहे, विलासासाठी नाही असे बजाविले आहे.