पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/६२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाभारतातील समाजकारण
५५
 

 ब्राह्मण व क्षत्रिय यांच्याप्रमाणेच वैश्यांचे महत्त्वही भारतीय तत्त्ववेत्ते पूर्णपणे जाणून आहेत. पुढील प्रवृत्तिधर्मप्रकरणी धनाचे भारतीयांना किती महत्त्व वाटत होते, धनावरच सर्व धर्म अवलंबून आहे असे त्यांना का वाटत होते, याचे सविस्तर विवेचन केलेले आहे. त्यावरून वैश्यांचे त्यांच्या मते किती महत्त्व आहे हे कळून येईल. कृषी, वाणिज्य हा सर्व राष्ट्राचा प्राण आहे हे महाभारतात अनेक ठिकाणी सांगितलेले आहे.
 भीष्म म्हणतात,

'वार्तामूलो ह्ययं लोकस्तया वै धार्यते सदा
तत्सर्वं वर्तते सम्यग् यदा रक्षति भूमिपः ।

- शां. ६८.३५

 सर्व जग हे शेती व व्यापार यावरच अवलंबून आहे. त्यामुळेच जगाचे पालनपोषण होत असते. राजा जेव्हा राष्ट्राचे पालन करीत असतो तेव्हाच यांची व्यवस्था ठीक असते.
 कोशसंचयाचे महत्त्व युधिष्ठिराला सांगताना पितामह भीष्मांनीच पुन्हा एकदा कृषि-वाणिज्याचे महत्त्व सांगितले आहे. ते म्हणाले, हे राजा, कृषी-गोरक्षण, व्यापार आणि अशाच प्रकारचे जे दुसरे कर्म असेल ते अनेक लोकांकडून करवावे. नाही तर ती कर्मे नष्ट होऊन जातील. कृषी-पशुपालन व व्यापार करू लागलेल्या मनुष्याला चोर अथवा अधिकारी यांच्यामुळे त्रास होत असेल तर त्यामुळे राजाच निंदेस पात्र होतो. राजाने अन्नपान आणि वस्त्रे यांच्या योगाने सदैव द्रव्यसंपन्न लोकांचा बहुमान करावा: हे भरतकुलोत्पन्ना, द्रव्यसंपन्न पुरुष हे राज्याचे मोठे अंग आहे. म्हणून तो सर्व प्राण्यांचे केवळ मूर्धस्थान आहे यात शंका नाही. (ककुदं सर्व भूतांना धनस्थो नात्र संशयः । -शां. ८८.३०) सारांश -