पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/६५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५८
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

 गृहस्थाच्या तपोविधीचे विवेचन करतांना पराशर म्हणतात,

तपः सर्वगतं तात हीनस्यापि विधीयते
जितेन्द्रियस्य दान्तस्य स्वर्गमार्गप्रवर्तकम् ।

- शां. २९५. १४

 'जनका, हे तप सर्वांस विहित आहे. ते शूद्रांनाही विहित आहे. जो जितेंद्रिय व संयमी आहे तो कोणीही असला तरी त्याला तप हे स्वर्गप्राप्तिकारक ठरेल.'
 शूद्राला काही अटीवर यज्ञाधिकार आहे असे पितामह भीष्मांनीच सांगितले आहे. वर्णाश्रमधर्मकथन करतांना युधिष्ठिरास ते म्हणाले, 'हे भरतकुलोत्पन्ना, ब्राह्मणादी तीन वर्णांना व शूद्रालाही यज्ञाचा अधिकार आहे. स्वाहाकार, वषट्कार व वैदिकमंत्र हे तीन मात्र शुद्धाला वर्ज्य आहेत. यास्तव शूद्राने अमंत्रक पाकयज्ञ करावे. या पाकयज्ञाची दक्षिणा दोनशेछपन्न मुठी धान्य होय असे सांगितले आहे. पैजवन नामक शूद्राने अमंत्रक यज्ञ करून एक लक्ष पूर्णपात्रे दक्षणा दिली असे आम्ही ऐकिले आहे.
 यज्ञाप्रमाणेच संन्यासाचाही अधिकार शूद्राला आहे असे भीष्मांचे मत आहे. वास्तविक भारतीयांच्या मते ब्राह्मणाखेरीज इतर कोणीही हा संन्यासधर्म स्वीकारू नये असे आहे. त्याचे विवेचन प्रवृत्तिधर्मात केले आहे. पण क्वचित् इतरांनाही संन्यास जेथे विहित म्हणून सांगितला आहे तेथे तो शूद्रालाही आहे.
 भीष्म म्हणतात, "हे पृथ्वीपते, वेदांतश्रवणाची ज्याला इच्छा आहे, जो स्वकर्मनिष्ठ आहे व ज्याला राजाने अनुज्ञा दिली आहे अशा शूद्राला सर्व आश्रम विहित आहेत. म्हणूनच पूर्वी सांगितलेल्या स्वधर्माचे आचरण ज्याने केले आहे अशा शूद्राला, वैश्याला व क्षत्रियालाही संन्यासाश्रम विहित आहे."