पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/६६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाभारतातील समाजकारण
५९
 

 वर्ण जन्मसिद्ध मानून भारतीयांनी जरी समाजव्यवस्था केली होती तरी ही व्यवस्था शक्य तितकी निर्विष करून टाकण्यासाठी. त्यांनी किती दक्षता घेतली होती हे यावरून कळून येईल. गुण रक्तनिष्ठ असतात हा आनुवंशातील विचार (जो अजूनहि युरोपात लोकांना झपाटून राहिला आहे) आणि वैदिक मंत्रांचे काही दैवी अनाकलनीय पावित्र्य यांवरील श्रद्धा, यांमुळे त्यांनी काही विषम वाटणारी बंधने घातली होती. पण तरी ही बंधने समाजोत्कर्षाच्या आड येऊ नयेत अशी शक्यतो खबरदारी त्यांनी घेतली होती असे दिसते.
 या भारतीय तत्त्ववेत्त्यांची दृष्टी राष्ट्रीय कशी होती, अगदी कडक व शाश्वत मानलेले धर्मनियमही राष्ट्रकल्याणासाठी झुगारून देण्यास ते मागेपुढे कसे पाहत नसत हे पुढील उताऱ्यावरून दिसून येईल.
 युधिष्ठिराने एके प्रसंगी भीष्मांस विचारले, 'पितामहा, दस्यू अनार्य इत्यादी शत्रूचे सैन्य चालून आले असता व सर्वत्र गोंधळ माजूनं राहिला असता ब्राह्मण, वैश्य किंवा शूद्र यांपैकी कोणी शस्त्रधारण करून प्रजेचे रक्षण केले तर त्याने पुढे राजकार्य करावे की नाही ? तो प्रजांचा अधिपती होऊ शकतो की नाही ? यावर भीष्मांनी पुढीलप्रमाणे उत्तर दिले आहे. समाजव्यवस्थेच्या बुडाशी अंतिम धोरण काय असावे हे त्यावरून स्पष्ट होते. भीष्म म्हणाले, 'राजा, अपार व नौकाशून्य अशा संकटरूपी समुद्रामध्ये जो मूर्तिमंत नौकाच झालेला असतो तो जरी शूद्र असला किंवा अन्य कोणी असला तरी त्याचा सर्वथैव सन्मान करणेच योग्य आहे.

अपारे यो भवेत् पारमप्लवे यः प्लवो भवेत्
शूद्रो वा यदि वाप्यन्यः सर्वथा मानमर्हति ।

-शां. ७८,३८