पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/६७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६०
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

 शत्रूंनी पीडित केल्यामुळे अनाथ होऊन लोक ज्याची मार्गप्रतीक्षा करतात व ज्याच्या आश्रयामुळे सुखाने नांदतात त्याचाच त्यांनी प्रेमाने आपल्या बांधवाप्रमाणे सन्मान करावा. हे कुरुकुलोत्पन्ना, संकटाचा नाश करणाऱ्या पुरुषाचा पुनः पुनः सन्मान करणे अवश्य आहे. लाकडाचा हत्ती, कातड्याचा हरिण, पीक न देणारे शेत, व तेजोहीन पुरुष ज्याप्रमाणे निरुपयोगी असतात त्याचप्रमाणे अध्ययन न करणारा ब्राह्मण, प्रजापालन न करणारा राजा आणि वृष्टी न करणारा मेघ हे व्यर्थ होत. म्हणून

नित्यं यस्तु सतो रक्षेदसतश्च निवर्तयेत्
स एव राजा कर्तव्यः तेन सर्वमिदं धृतम् ।

- शां. ७८.४४

 जो नेहमी सज्जनांचे रक्षण करील व दुष्टांचे पारिपत्य करील त्यालाच- तो कोणत्याहि वर्णाचा असला तरी- राजपद दिले पाहिजे. त्याच्याच बलामुळे सर्व राष्ट्राचे धारण होत असते.
 वर्णधर्म कितीही कडक असले तरी राष्ट्रोत्कर्षाच्या आड ते येत असतील तर त्यांची मुळीच प्रतिष्ठा नाही हेच धोरण या वचनातून दिसून येते. आणि 'प्रभवार्थाय भूतानां धर्मप्रवचनं कृतम् | यः स्यात् प्रभवसंयुक्तः स धर्म इति निश्चयः ॥ धर्मनियम हे राष्ट्राच्या उत्कर्षासाठी केलेले असून ज्यामुळे राष्ट्रोत्कर्ष होईल तोच धर्म होय हे तत्त्व ध्यानी वागवूनच भारतीयांनी समाजव्यवस्था केली होती. पारलौकिक कल्पनेला प्राधान्य देऊन धर्म म्हणजे काही अनाकलनीय, अदृष्ट असा पुण्यसाठा मिळविण्याचा मार्ग असे ते समजत नव्हते, हे यावरून निर्विवाद सिद्ध होते.

● ● ●