पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/७०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
व्यवहारनीती अथवा राजनीतिशास्त्र
६३
 

वाटण्याचा संभव आहे. तरी पण या प्राचीन ग्रंथात राजनीतीसारख्या अत्यंत गहन शास्त्राचा विचार तरी कसा केला आहे हे कुतूहल म्हणून तरी भारतीयांनी पाहावे असा माझा आग्रह आहे. आणि त्या हेतूनेच पुढील विवेचन केले आहे.

समस्या

 महाभारतात पुढीलप्रमाणे अगदी विरुद्ध अर्थाची वचने अनेक ठिकाणी सापडतात.
 १. सर्वभूतहितः साधुः असाधुः निर्दयः स्मृतः । वन.३१३।९२
 सर्व भूतांच्या हितासाठी झटतो तो साधू व निर्दयतेने वागतो तो असाधू (दुष्ट) होय.
 २. वेदाऽहं तव या बुद्धि: अनृशंस्या अगुणैव सा । शां. ७५
 तुझ्या बुद्धीला क्रूरत्वाचा स्पर्शही नाही हे मी जाणून आहे. पण अशा प्रकारची बुद्धी व्यर्थ होय.
 एका ठिकाणी दयेची महती सांगितली आहे तर दुसऱ्या ठिकाणी क्रूरत्वावाचून सर्व व्यर्थ होय असे म्हटले आहे.
 त्याचप्रमाणे पुढील वचने पाहा-
 १. ना सो धर्मो यत्र न सत्यमस्ति ।
 न तत् सत्यं यत् छलेनाभ्युपेतम् । - उद्योग ३५/५८
 ज्यात सत्य नाही तो धर्म नव्हे व जे कपटाने दूषित असेल ते सत्य नव्हे.
 २. कृतं मम अप्रिय तेन येनायं निहतो मृधे
 इति वाचा वदन् हंतॄन् पूजयेत रहोगतः । - शां. १०२।३७
 या शत्रुवीराचा लढाईत ज्याने वध केला त्याने माझे अत्यंत अप्रिय केले आहे, मला दुखविले आहे असे बाह्यतः म्हणावे, पण अंतस्थ रीतीने त्या शत्रूला मारणाऱ्याचा गौरव करावा.