पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/८२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
व्यवहारनीती अथवा राजनीतिशास्त्र
७५
 

म्हटले आहे. महाभारतातील या परनीतीचे रूप आता आपणांस पाहावयाचे आहे.

परनीती

न हि पश्यामि जीवन्तं लोके कंचिदहिंसया
सत्वैः सत्त्वा हि जीवन्ति दुर्बलैर्बलवत्तराः ।

- शांति. १५/२०

 'युधिष्ठिरा, अहिंसा वृत्तीने जगात कोणी जिवंत राहिल्याचे दिसून येत नाही. खरोखर बलवान प्राणी आपल्याहून दुर्बल असलेल्या प्राण्यांवर उपजीविका करीत असतात.' ध्येयवादी सत्याची एकांतिक भक्ति करणाऱ्या युधिष्ठिराला अर्जुनाने जगातील व्यवहारासंबंधीचे हे कठोर सत्य सांगितले आहे आणि हे ध्यानात घेऊनच भारतीय तत्त्ववेत्त्यांनी व्यवहारवादाचा उपदेश केला आहे.
 'याप्रमाणे मी तुला हे नीतिशास्त्र सांगितले आहे. याचा पातकांशी संबंध आहे. म्हणून मनुष्याने अशा प्रकारचे आचरण सदैव करू नये. पण शत्रूने अशा आचरणाचा प्रयोग केला तर मी सांगितलेल्या नीतीचा अवलंब केल्यावाचून कसे चालेल । तात्पर्य, हे मी तुझ्या हिताकरिता सांगत आहे. अशा प्रसंगी याच धर्माचे आचरण केले पाहिजे. ते दोषावह नाही. -' (शांति.अ. १३९) या वाक्यांत महाभारतकारांनी परनीतीची आवश्यकता व तिच्यां मर्यादा स्पष्ट करून सांगितल्या आहेत. या नीतीचा अवलंब नेहमी करावयाचा नाही, स्वकीयांशी करावयाचा नाही, ते पातक होईल. ही नीती शत्रूशी वागताना आचरावयाची आहे. त्या वेळी ती धर्मविघातक ठरत नाही.