पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/८७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८०
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

केले आहेस आणि येथे साफ घसरला आहेस. 'आमच्यापैकी एकाला मारून राजा हो' असे तू सांगितलेस तरी कसे? मागे शकुनीशी तू जसे द्यूत केलेस तसलेच द्यूत तू पुन्हा मांडले आहेस. राजा, तू आपल्या शत्रूला फायदेशीर अट देऊन त्याला चांगल्या जागेवर आणून ठेवलेस आणि स्वतः मात्र खाड्यात पडला आहेस. एकंदरीत आपण पुन्हा विपत्तीत सापडलो खरे ! अरेरे, अजूनही तुला ही बुद्धी सुचते, त्याअर्थी ही पंडूची व कुंतीची संतती राज्य भोगीच नाही, निरंतर वनवास व दारिद्र्य भोगण्यासाठीच तिचा जन्म आहे !-' (शल्य. अ. ३३).
 पुढे भीम व दुर्योधन यांचे महायुद्ध सुरू झाले. दुर्योधन मुळीच हटेना तेव्हा अर्जुनाला चिंता वाटू लागली. तेव्हा श्रीकृष्ण त्याला म्हणाले, 'अर्जुना, भीम व दुर्योधन या दोघांचे शिक्षण सारखेच आहे. भीम अधिक बलवान आहे पण दुर्योधन हा त्याच्यापेक्षा अधिक घटलेला व प्रयत्नशील आहे. तेव्हा भीमसेन जर धर्मयुद्धाचे नियम पाळून लढेल तर त्याला जय मिळणार नाही. त्याने अन्यायाने युद्ध केले तर तो खात्रीने सुयोधनास ठार मारील. देवांनीसुद्धा कपटानेच दैत्यांस जिंकले असे आम्ही ऐकिले आहे. म्हणून म्हणतो भीमाने कपटप्रचुर असा पराक्रम करावा. शिवाय, 'युद्धात मी सुयोधनाची मांडी फोडीन,' अशी भीमाने प्रतिज्ञाही केली आहे. ती आपली प्रतिज्ञा त्याने पूर्ण करावी म्हणजे झाले. अर्जुना, दुर्योधन तरी मायावीच आहे. तेव्हा उलट भीमानेही त्याचे मायेनेच तुकडे उडविले पाहिजेत. भीम जर आपल्या बळावर भिस्त ठेवून न्यायाने लढू म्हणेल, तर युधिष्ठिर संकटात पडेल, यात संशय नाही. अर्जुना, मी तुला पुन्हा सांगतो, ऐक. धर्मराजाच्या त्या अपराधामुळेच आपणांस भय उत्पन्न झाले आहे.