पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/९२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
व्यवहारनीती अथवा राजनीतिशास्त्र
८५
 


गोड वाणी

 राजा प्रसंग पाहून, राजाने मृदुता व तीव्रता या दोहोंचेही अवलंबन करावे. युधिष्ठिरा, शत्रपात करण्यापूर्वी व चालू असतानाही प्रिय भाषण करावे आणि प्रहार केल्यानंतरही शोक केल्यासारखे अथवा रोदन केल्यासारखे दाखवून कारुण्य प्रकट करावे. "माझ्या लोकांकडून संग्रामात आपल्यावर शस्त्रप्रहार झाला हे मला इष्ट नाही; पण काय करावे ! मी पुनः पुनः सांगितले तरी ते माझे ऐकत नाहीत. ज्याने हा अन्याय केला आहे त्याने मला फार दुःख दिले आहे" असे बाहेर उद्गार काढावे आणि अंतस्थ रीतीने ज्याने त्या शत्रूला ठार केले असेल त्याचा गौरव करावा. बाह्यतः प्रहार करणाऱ्या लोकांशी अपराधी मनुष्यासारखे वर्तन ठेवावे आणि लोकप्रीती संपादन करण्यासाठी, ज्याचा वध केला असेल, त्यांच्यासाठी विलापही करावा. सारांश अशा रीतीने कोणत्याही स्थितीत सामोपचाराने वागणारा धर्मवेत्ता राजा सर्व प्राण्यांना प्रिय होतो. त्याला कोणतीही भीती राहात नाही.
 जित शत्रूला क्षमा करू नये असे कोठे सांगितले आहे तर कोठे त्याला मोठ्या सन्मानाने वागवावे असेही सांगितले आहे. नारदांनी युधिष्ठिराला राजनीतीचा उपदेश केला तेव्हा ते म्हणाले, 'हे वीरपुंगवा, शत्रूला जिंकणे व जिंकल्यावर योग्य प्रकारे त्याचे रक्षण करणे यात वीरांचे खरे शौर्य आहे. तेव्हा तू शत्रूस हस्तगत केल्यावर त्याचे नीटपणे रक्षण करतोस ना ?' -(सभा.अ.५) शांतिपर्वातील वामदेवगीतेतही असाच उपदेश आहे. 'जो राजा कल्याणकारक आचरण करणाऱ्या शत्रूभूत राजाला संग्रामामध्ये धरल्यानंतर द्वेषामुळे त्याचा बहुमान करीत नाही, तो क्षात्र धर्मभ्रष्ट होय. ' (शांति.अ.९३)