पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/९६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
व्यवहारनीती अथवा राजनीतिशास्त्र
८९
 

संपन्न पुरुष इहलोकामध्ये संपत्ती, सैन्य व आमात्य संपादन करू शकतो. जो मनुष्य द्रव्यसंपन्न नसेल तो खरोखर महापातकी होय. अल्पसे द्रव्य हे केवळ उच्छिष्ट होय. (श्रियोबलममात्यांश्च बलवानिह विन्दति । यो ह्यनाढ्यः स पतितः तदुच्छिष्टं यदल्पकम्) बलाढ्य पुरुषाला त्याच्या भीतीमुळे कोणाकडून फारसा अपकार होत नाही. बल आणि धर्म ही उभयता जर खऱ्या अधिकाऱ्यामध्ये वास्तव्य करीत असली तर मोठ्या भीतीपासूनही रक्षण करू शकतात. तथापि, धर्माहून बलाचीच योग्यता अधिक आहे. कारण बलाच्या योगाने धर्माची प्रवृत्ती होते (अतिधर्मात् बलं मन्ये बलात् धर्मः प्रवर्तितः ।) इतकेच नव्हे तर ज्याप्रमाणे जंगम पदार्थ पृथ्वीवरच अवलंबून असतात त्याप्रमाणे धर्म हा बलावरच अवलंबून असतो. ज्याप्रमाणे धूम वायूच्या अधीन असतो त्याप्रमाणे धर्मही बलाच्याच अनुरोधाने वागतो. वृक्षाचा आश्रय करून राहणाऱ्या वेलींची जशी वृक्षावर सत्ता चालत नाही तशीच बलावर धर्माची सत्ता चालत नाही. सुख जसे विलासी पुरुषाच्या अधीन असते तसा धर्मही बलाढ्य पुरुषांच्या अधीन असतो. तेव्हा राजा, हे लक्षात ठेव की, बलाढ्य लोकांना असाध्य असे काही नाही.' (शांति १३४)
 ऐहिक बल व पारमार्थिक बल यांचा योग्य विवेक करून सर्व पारमार्थिक बल (म्हणजेच धर्म) हे ऐहिक बलावर अवलंबून आहे असे भारतीय तत्त्ववेत्त्यांनी स्पष्ट मत दिले आहे. म्हणूनच धर्म हे जरी एखाद्यास अंतिम साध्य वाटले तरी तो धर्म ज्या ऐहिक बलावर अवलंबून आहे त्याची उपासना प्रथम त्याने केली पाहिजे, आणि त्यासाठी ज्या उपायांचा अवलंब करावा लागेल त्या उपायांचा अवलंब केला पाहिजे. सत्य, धर्म, अहिंसा या उदात्त तत्त्वांना जी