पान:भूमी आणि स्त्री.pdf/१०७

हे पान प्रमाणित केलेले आहे.

उपयोगात आहे. ही धान्ये समृद्धीचे प्रतीक आहेत.
 तीळ मांगल्यदर्शक आहेत. नारळ हे आत्मसमर्पणाचे प्रतीक आहे. नारळ फोडणे म्हणजे सर्वस्व अर्पण करण्याची भावना व्यक्त करणे. समर्पणाचे प्रतीक म्हणून तिळाची अंजुली टाकण्याची पद्धत रूढ आहे. तीळ हे चरबीचे (फॅटस् चे) प्रतीक आहे. 'देवाल तेल वाहणे' या प्रवृत्तीमागेही जीवनातील जे जे स्निग्ध आहे ते परमेश्वराला देण्याची भावना असते. भारतीय संस्कृतीमध्ये जेवढे सण आणि उत्सव आहेत त्यांचा धर्मभावनेशी संबंध नाही. 'हिंदू' ही एक जीवनपद्धती आहे. संस्कृती आहे. ती भारतात राहणाऱ्या माणसांच्या जगण्याचा एक अविभाज्य घटक आहे. तीळ हे औषधीही आहेत. तिळाचे त्रिविध महत्त्व प्राचीन काळापासून येथील समाजाला जाणवले होते. त्यामुळेच या लोकोत्सव गीतांतून तीळ आणि तांदळाचा उल्लेख आवर्जून येतो.
 हा माळी कोण?
 या गाण्यात माळ्याचा संदर्भ आहे. हा माळी कोण ? इतिहासाचार्यांनी संकलित केलेल्या हादग्याच्या नमनगीतात 'औषध दे रे बा माळी' अशी ओळ आहे. परंतु दुसरा, अधिक प्रचलित पर्याय 'आयुष्य दे रे बा माळी' हा आहे आणि तो अधिक अर्थगर्भ वाटतो. या ओळीतील 'माळी' ही संकल्पना संकुचित अर्थाने वापरली नसावी. हे आयुष्य केवळ स्वतःला वाघरादाराला मागितले नसावे. ते शेताभाताला मागितले असले पाहिजे.

माळी गेला शेतामाता
पाऊस पडला येताजाता

या ओळींमधून विश्वाला फुलविणाऱ्या विश्वातील पंचमहाभुतांना नियंत्रित करणान्या 'परमेश्वर रूपी' माळ्याची प्रतिमा डोळ्यासमोर येते. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत जगंनियंत्यास 'माळी' म्हटले आहे.
  माळिये जेऊ ते नेले । तेउते निवांत चि गेले|
  तेया पणिया ऐसे जाले। नाठवे हे ।। १२०॥

(अध्याय १२ वा ज्ञानेश्वरी)

 (माळी ज्या पाटाला पाणी लावतो त्या पाटाने ते पाणी निवांत वाहत जाते. त्या पाटाविषयी ते पाणी काहीच चिंता करीत नाही).

१०२
भूमी आणि स्त्री