पान:भूमी आणि स्त्री.pdf/१३४

हे पान प्रमाणित केलेले आहे.

साडी माझ्या आईला
आई आई चोळ्या शिव
चोळ्या माझ्या बहिणीला
बहिणी बहिणी भातकुल दे
भातकुल माझ्या भावाला
भावा भावा गोंडे दे
ते गोंडे घेऊ सासरी जाऊ
सासराच्या वाटे कुचूकुचू काटे
माहेरीच्या वाटे गुलालबुक्का दाटे

 फुललेला निखारा त्यात भुलोजी राणा बसला आहे आणि वारा घालून भुलाबाईला तो निखारा फुलविण्याची आज्ञा दिली जात आहे. गाण्याच्या पहिल्या तीन ओळी वाचताना दुर्गाताई भागवतांनी भुलोजीबाबत केलेले विवेचन सार्थ वाटते. अग्नीसाठी प्रागइतिहासात काळात साहस करावे लागे. अशा साहसी वीरांविषयी समाजाला विशेषतः स्त्रीसमाजाला वाटणारी कृतज्ञता 'झिग झिगवाणा' या शब्दातून फुललेल्या निखाऱ्याचे चित्र रंगरूपासह समोर येते. मात्र या तीन ओळीनंतर या गाण्याचे रूपांतर मालागीतात होते.या मालागीतात हे देऊन ते मग ते देऊन आणखी काही अशी मालिका असते. या गीतामागील मानसिकताही खास स्त्रीमनाचे चित्र रेखाटणारी असते. सर्वसामान्य स्त्रीवर्गहा भारतीय जीवनपद्धतीत शोषित म्हणूनच आजवर जगत आला. छोट्या छोट्या सुखांसाठी इच्छापूर्तीसाठी खूप मोठी तडजोड करावी लागे. ते सुख हाती येण्यासाठी दहा ठिकाणी होणारी वणवण त्यातून व्यक्त होते. अधेली कोणाकडे हक्काने मागता येत नाही. तीही खेळातच सापडते.
 या गीतातही 'शोभा' गाईला देऊ नि मग गाय भरपूर दूध देईल असा उल्लेख आहे. भुलाबाईची गाणी सर्जनाच्या सत्काराची गाणी असल्याने दुधासाठी शोभा या पदार्थाचे उल्लेख अनेकदा येतात. शोभा म्हणजे जे सर्वात चांगले शुभ आहे ते. लोकसाहित्य आणि संत साहित्य यांचे आपल्याला जे सहज दर्शन घडते त्यातून मनाला सतत जाणवत राहते की त्या साहित्यातून येणारे माहेर हे लौकिक माहेर या संकल्पनेपेक्षा आधिक आगळेवेगळे आहे. त्या माहेराला परातत्त्वाचा स्पर्श झालेला आहे. तसेच आमच्या लोकसाहित्यातील माहेर, स्त्री मनातील सुखाचे, तृप्तीचे, मुक्तीचे प्रतीक आहे. ते जणु 'स्वप्नभूमी' आहे. आमच्या महाराष्ट्र संतांनीही म्हटले आहे.

भूमी आणि स्त्री
१२९