पान:भूमी आणि स्त्री.pdf/१४५

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 पुणे - सातारा परिसरात शिवछत्रपतींच्या स्वराज्य स्थापनेमुळे सामान्य माणसांना नवी प्रेरणा मिळीली. घरातल्या पुरुषांचा मुलुखगिरी हा महत्त्वाचा व्यवसाय बनल्याने घरातील जबाबदाऱ्या स्त्रियांना सांभाळण्याची जिम्मेदारी घ्यावी लागली. पारंपरिक सण वा उत्सव मोकळपणाने साजरे करण्याचे धैर्य वा हिंमत समाजात निर्माण झाली. भोंडल्याच्या गाण्यांतील उत्साहाची नवी लय याच काळात गुंफली गेली असावी असे वाटते. मात्र तसा गेय पुरावा देता येत नाही. ह्या गाण्यात या वेगवेगळ्या लयी कशा दाखल झाल्या हे पुरावा देऊन सांगणे शक्य नाही. तरीही या गाण्यांची वेगवान लय झिम्म्याच्या ठेक्यातून उचलली गेली असे वाटते. तसेच सासरमाहेरच्या नात्यांचा नाजूक तरीही धीट अशा अभिव्यक्तीचा धागाया गाण्यात गुंफला गेला असावा.
 भारतीय संगीत परंपरा -
 या गीतांतील स्वर प्राथमिक अवस्थेतील आणिखर्जातील आहेत.आज प्रचलित असलेल्या शास्त्रीय संगीताचे मूळ लोकसंगीतात आहे, हे संगीत शास्त्रज्ञांना आणि कलावंत गायकांना मान्य असलेले तथ्य आहे. सुप्रसिद्ध गायक कलावंत श्री. कुमार गंधर्व यांनी लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीत यांचा अनुबंध समर्पक रीतीने सोदाहरण स्पष्ट केला आहे. प्राचीन परंपरा असलेल्या भारतीय संगीतातून तो स्पष्ट होतो. पितामह ब्रह्मदेवाने सामवेदापासून संगीत निर्माण केले असे मानतात. सामवेदात ऋग्वेदाच्या ऋचा स्वरालापात गायल्या जात.यज्ञसमारंभांतून देवांना अर्पण करताना त्यांच्या मनोरंजनार्थ ऋचा मधुरस्वरात म्हणत. या ऋचांच्या क्रियेतून सुबद्ध संगीताची उत्पत्ती आली असावी असे मानले जाते. साम म्हणजे गायन, यज्ञाच्या निमित्ताने संगीत शास्त्राचा पाया घातला जात असतानाच लौकिक संगीतही अस्तित्वात असले पाहिजे. कारण श्रम हलके करण्यासाठी स्वरसमूहांचा आधार घेण्याची प्रथा आदिम असून, आदिवासी समाजात आजही देवतांची आराधना, तसेच विवाहगीते इ. गाणी परंपरेने चालत आलेली दिसतात. श्रमपरिहार करणारी भलरी, ओव्यांसारखी गीते ग्रामीणजनांत परंपरेने चालत आली आहे. ती आजही आवडीने गायिली जातात. या स्वररचनांचा स्वतंत्रपणे शोध घेण्याच्या प्रेरणेतून संगीत शास्त्राचा आरंभ झाला असावा.
 भोंडला भुलाबाईची गाणी समूहाने गायिली जातात. त्यातील स्वर तारसप्तकातील नसून मध्यसप्तक आणि खर्जातले आहेत. षड्ज, रिषभ, गंधार,

१४०
भूमी आणि स्त्री