पान:भूमी आणि स्त्री.pdf/१४६

हे पान प्रमाणित केलेले आहे.

मध्यम, क्वचित् कोमल गंधार अशा पाच - सहा शुद्धस्वरांचे प्राबल्य या गाण्यांतून जाणवते.
 आज जे भारतीय संगीत आहे ते मुस्लिम गायकीचा प्रभाव पडून विकसित झालेले संगीत आहे. परंतु प्राचीन भारतीय संगीत दोन स्वरांमधील अंतर मोजण्याचे परिमाण श्रुती याला केन्द्रस्थानी मानून विकसित झालेले आहे. श्रुतींच्या ध्वन्यन्तरावरून भारतीय संगीतशास्त्रांत मतमतान्तरे आहेत. त्यात खोल शिरण्याचे काही कारण नाही.
 भोंडला भुलाबाईची गाणी या परिभाषेत बसविणे अवघड आहे. तरीही एवढे म्हणता येईल की ही गाणी मंद्र आणि मध्य सप्तकात आहेत. त्यातील स्वरांवरून ती प्राचीनतम असावीत. भुलाबाईच्या गाण्यांची ठाय, गंभीर लय आणि भोंडल्याच्या गाण्यांतील मंत्रात्मक लय पाहता, त्या लयींचे नाते प्राचीन उदगीथा पूर्वीच्या अन्नासाठीच्या समूह प्रार्थनांशी असावे असे वाटते, असे जे प्रारंभी म्हटले आहे त्याचे कारण हेच होय. ही गाणी समूहाने गायिली असल्याने त्यात अनवट स्वर नाहीत. स्वर अतिशय सुलभ आणि शुद्ध स्वरूपातील आहेत.
 या गाण्यांची छंदोरचना -
 ऋग्वेद ही जगातील सर्वात जुनी छंदोमय रचना मानली जाते. ज्या रचनांच्या गायनाने मनास आल्हाद होतो, चितवृत्ती उल्हसित होतात त्या रचना छंद या नावाने उल्लेखिल्या जात. 'छंदयति आल्हदयति इति छंदः' प्रसिद्ध गुर्जर पंडित केशव हर्षद् धृव यांनी असे प्रतिपादिले आहे की ऋग्वेद रचने पूर्वीही छंदोमय रचना, यज्ञाव्यतिरिक्त, दैनंदिन जीवनातील भावप्रकटनाच्या निमित्ताने होत होती. या रचनांसाठी त्यांनी युजुस् ही संज्ञा वापरली आहे. देवतांच्या स्तुतीसाठी, आनंदासाठी काव्यमय ऋचांची निर्मिती झाली. वैदिक छंदोरचनेत संवादिता आणि मेघगंभीर माधुर्य आहे.
 भोंडला भुलाबाईच्या गीतांच्या छंदोरचनेच्या दृष्टीने शोध घेताना मराठी छंदोरचना या ग्रंथाचे लेखक श्री. ना. ग. जोशी यांनी काही गीताच्या छंदाबाबत चर्चा केली आहे. प्राकृत अपभ्रंश रचनेत परिलीना जातीवृत महत्त्वाचे आहे. परिलीना जातीच्या प्रत्यक्ष उपयोगात शेवटची २ अक्षरे गुरु असलात.

भूमी आणि स्त्री
१४१