पान:भूमी आणि स्त्री.pdf/१५६

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 पाच पांडव : शेतीच्या सुफलीकरणाचे प्रतीक -
 मंगळवारी आणि शनिवारी पेरणी करीत नाहीत. हे दोनही वार शनी आणि मंगळ या तापग्रहांचे आहेत. त्यांची पीडा होऊ नये म्हणून हे वार टाळतात. मराठवाड्यात अनेक ठिकाणी पेरणीच्या वेळी पाच दगडांना चुना लावून, लिंबाची वा तुरांट्याची छोटीशी कोपी करून त्यात ते मांडतात. त्यांना पाच पांडव म्हणतात. पांडवांबरोबर कुंती आणि द्रौपदीचा असे दोन दगडही मांडतात. शेतीच्या एकूणच विधींमध्ये या पांडवांना महत्त्व असते. दिवाळीत बलिप्रतिपदेसही शेणाचे पाच पांडव, द्रौपदी, कुंतीसह अंगणात मांडतात. इळा आवसेसही पाच पांडवांची पूजा असते. हे पाच पांडव शेतीला ऊर्जा देणारे, शेती सुफलित करणारे, शेतीचे अनिष्टापासून रक्षण करणारे असावेत. पाच पांडव, कृषिविधानातील त्यांच्या महत्त्व हे दैवतशास्त्रा समोरचे एक आव्हान आहे असे म्हटल्यास वावगे होऊ नये.
 नाशिक भागात, आदिवासी समाजात पेरणीपूर्वी कोंबडे म्हसोबापुढे मारून त्याच्या रक्तात पेरावयाचे बीज भिजवून मग पेरणी करतात. तर कोल्हापूर, कोकण भागात पेरणीपूर्वी 'सात' नावाचा विधी केला जातो. हा विधी म्हणजे भूमीची शांती करणे होय.
 कुरी नव्हे तर काशीच -
 शेतकरी स्त्री कुरीला 'काशी'ची उपमा देते. मातेला जशी तिच्या मुलांच्या संगोपनाची काळजी असते, तशी पेरणी करणाऱ्या कुरीलाही आपल्या लेकरांच्या पोटाची काळजी असते. भरपूर अन्नधान्य निर्माण करणारा पेरा व्हावा ही तिची सदिच्छा असते. कुरी वा तिफणीच्या संदर्भातील ओव्यांतून असे लक्षात येते की बहिणीने भावाच्या शेतात पेरा करणाऱ्या कुरीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत.

चुड्याचे हात माझे कुरीबाई चाड्यावरी
बंधूंची नजर भैणाबाईच्या पेयावरी....
वळीव पाऊस लागून गेला राती।
बंधूजीचा शाळू पेराया दिली घाती.....
चाड्यावरी मूठ घेतो बहिणीच नाव
बंधवाला माझ्या दुनीनं दैव द्याव.....

भूमी आणि स्त्री
१५१