पान:भूमी आणि स्त्री.pdf/२१०

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 हळूहळू गणराज्यांचा लोप होऊन राजाला प्रमुख प्रशासक मानणारी शासन व्यवस्था अस्तित्वात आली. महाभारतकाळात ही शासन व्यवस्था स्थिर होत गेली. काही गणसमाज अस्तित्वात होते. महाभारतातील एक प्रसंग असा -
 युधिष्ठिराने केलेल्या यज्ञात सहभागी होण्याचे जरद्गवा या महिलेने नाकारले. तेथे जाण्यासाठी युवाश्व राजाने बळजबरी केली. फुलावर आलेली शेते आणि विक्रीसाठी तयार असलेले लोणी वाऱ्यावर सोडून जाणे तिला मान्य नव्हते. यावर डॉ. गणेश शिटे लिहितात, शेतातील भराला आलेल्या गव्हाचा आणि साठलेल्या लोण्याचा नाश होऊ नये. अशी तिची स्वाभाविक इच्छा आहे. त्यावरून तिचे शेती व व्यापार यांकडे असलेले लक्ष जाणवते.मातृसत्ताक समाजात स्त्रीचे स्थान का श्रेष्ठ होते हे या उदाहरणावरून जाणवते.
 मातृसत्तेचा लोप -
 गण हा सामूहिक जीवन जगणारा समाज होता. गणातील लोक गणसभेत नियमितपणे एकत्र येत. विचारविनिमय करून एकत्रितपणे व्यवहार पार पाडीत. ही गणनीती जोवर अबाधित होती तोवर त्यांचा पराभव झाला नाही. कालौघात राजाला सार्वभौम मानणारी राजसत्ता विकसित होत गेली. उत्पादन साधनांचा विकास होत गेला. त्यातूनच मातृसत्ताक समाज व्यवस्था, जी प्राचीन गणजीवी समाजाचा एक विशेष होती, ती लोप पावली. असे असले तरीही पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीदेवतांचे माहात्म्य टिकून राहिले. त्यांचे चिवटपणे टिकून राहण्याचे महत्त्वाचे कारण हेच असावे की बहुसंख्य भारतीय समाज कृषिजीवी होता. कृषिसमृद्धी, जमिनीचे सुफलीकरण आणि भूमीरूप स्त्री देवता यांच्यातील अतूट एकतेच्या कल्पनेचा आदिबंध समाजमनातून नाहीसा होऊ शकला नाही त्याचा प्रत्यय या सणांतून येतो.
 आर्य येण्यापूर्वी भारतात मातृसत्ताक समाज व्यवस्था होती हे अनुमान सिंधू संस्कृतीच्या उत्खननातून सिद्ध झाले आहे. या व्यवस्थेतच स्त्री देवतांचा संप्रदाय निर्माण झाला असावा. सिंधूच्या खोऱ्यापासून ते नाईल नदीच्या खोऱ्यापर्यंत स्त्रीदेवतांचे अवशेष सापडतात. मध्य आशियातील देवी संप्रदाय आणि भारतातील शक्तीसंप्रदाय यात साम्य आहे. हे दोन्ही संप्रदाय एकाच आर्थिक व सामाजिक

भूमी आणि स्त्री
२०५