पान:भूमी आणि स्त्री.pdf/२३७

हे पान प्रमाणित केलेले आहे.

सूर्याचे महत्त्व खूप.बाळंतीण प्रथम सूर्य पूजा करून मग विटाळ फिटतो. हिमालयाच्या पायथ्याशी मार्गशीर्ष पौषात सूर्यपूजा करतात.
 द्यावा पृथ्वीचा विवाह कोल्ह्याने मोडला -
 ऋग्वेदाच्या काही सूक्तांत पृथ्वी आकाश यांना पतिपत्नी मानले आहे. 'द्यावापृथ्वी' चा विवाह ठरला. संपूर्ण तयारी झाली. परंतु कोल्ह्याने चलाखी करून हा विवाह मोडला पण त्याबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त केला. कारण द्यावीपृथ्वी एक झाले असते तर सगळे जीव, निसर्ग त्यात चेमटून नष्ट झाले असते.
 मानवाने प्रथम देवत्व कल्पिले ते स्त्रीरूपात - सर्जनाची गहन गूढ शक्ती धारण करणाऱ्या देवी रूपात. मातृदेवताही मानवी संस्कृतीच्या इतिहासातील 'आद्यशक्ती' आहे. तसेच सूर्योपासना ही मानवाच्या सांस्कृतिक विकासास सुरुवात झाली तेव्हापासूनची आहे. केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील बहुतेक देशांतील लोक सूर्यपूजक होते.
 सूर्योपासना जगभर -
 असिरिया व बाबिलोन या प्राचीन देशांत सूर्योपासना होती. बाबिलोन येथे सूर्यमंदिर सापडले आहे. फिनिशियन (पणीन् ) सूर्यपूजा करीत. इराणी लोक सूर्याला मिथ्रास (मित्र) या नावाने ओळखत. या मिथ्राबरोबर रश्न आणि नर्शेफ हे पार्श्वचर असत. मिथ्र धर्मीय इराणी भारतात आले. आल्यावर रश्नची राणी झाली. भारतीय लोक धर्मात ती रानूबाई-रांदल, राणूबाई या नावाने पूजली जाते. अलेक्झांडरच्या स्वारीचे वेळी, मूळचे मिडायतले लोक इराणातून भारतात आले. ते सूर्य आणि अग्नी यांचे उपासक होते. त्यांना मग ब्राह्मण म्हणत. शककुशाणांच्या काळातही एक लाट भारतात आली. काश्मीरात पहिले ठाणे उभारले. नंतर पंजाबात मुलतान, पूर्वकिनाऱ्यावर कोणार्क, मध्यभारतात काल्पी येथे सूर्य मंदिरे बांधली. वराहमिहिर हा मगब्राह्मण होता. सूर्यमंदिराचे पुजारी हे मगब्राह्मण असत. तसा दंडक बृहत्संहितेत वराहमिहिराने घालून दिला आहे. सूर्यपूजेशी निगडित 'राज्ञीस्नापन' हे व्रत काश्मीरात पाळले जाते. भूमी ही सूर्यपत्नी आहे अशी समजूत तेथील स्त्रियांची आहे. चैत्र किंवा फाल्गुनातल्या कृष्णपंचमीपासून ते अष्टमीपर्यन्त ती रजस्वला असते. अष्टमीला भूमी सारवून तिथे फुले वाहतात.

२३२
भूमी आणि स्त्री