पान:भूमी आणि स्त्री.pdf/८२

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 विदर्भ खानदेशात भुलाबाई हा कुमारिकांचा खेळोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. तर कोकण पश्चिम महाराष्ट्रात हादगा व भोंडला मांडला जातो. भुलाबाई भाद्रपद पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमेपर्यंत बसवली जाते. हादगा हस्तनक्षत्रात मांडतात तर भोंडला नवरात्राचे १० दिवस खेळला जातो. विदर्भात याच काळात भराडी गौर आणि इनाई हे उत्सव कुमारिका साजरे करतात. आश्विन महिन्याला उत्तरेत 'क्वारका महिना' असे म्हटले जाते. खरिपाची...पाऊस काळात पेरलेली पिके या काळात निसवून त्यात अन्नरस भरले जातात. बीजाचे बाळपण जाऊन पुनर्निर्मिती करण्याची क्षमता, शक्ती त्यांच्यात येते. धरणीच जणु या काळात भराला येते. धरणीची सुफलनशक्ती पूर्णत्वाला पोहोचण्याचे हे दिवस. जणु या काळात ज्यांच्यातील असुशक्ती पूर्णत्वला पोहोचलेली आहे अशा कुमारिकांनी धरतीवर फेर धरावेत, मंत्रात्मक स्वर समूहाने गावेत, त्यामुळे भूमीची सुफलन शक्ती वाढून अन्नसमृद्धी आसंडून निर्माण होईल अशी धारणा या उत्सवांमागे असेल का ?
 या विश्वाचे व्यवहार सुरळीतपणे चालविणारी एक अद्भुत शक्ती आहे, ती सृजन करते, संवर्धन करते, तशीच ती संहारक आहे. ही शक्ती कल्पनारूप, अमूर्त आहे. तसेच ती रसमय आहे. विश्वातील सर्व वस्तूंमध्ये १५'असु' नामक यात्वात्मक शक्ती असते. ती निरनिराळ्या वस्तू वा व्यक्तीच्या ठिकाणी कमीअधिक प्रमाणात असते. ही शक्ती विशिष्ट मंत्र वा विधींच्या साहाय्याने वाढविता वा कमी करता येते. वरुण ही पर्जन्य देवता तिला 'असुर' म्हणत.'असु' शक्तीने भारलेला तो असुर. भाद्रपद, आश्विन हे दोन महिने वर्षनसर्जनाच्या कळा पूर्णत्वाला पोहोचण्याचे महिने. त्या काळात भोंडला, हादगा, भुलाबाई हे कुमारिकांचे खेळोत्सव साजरे होतात ही बाब महत्त्वाची आहे.
 भोंडला वा हादगा -
 वर्षाकाळाचे चारही महिने भूमीची सुफलनशक्ती वाढण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे. भारतीय सण, व्रते, उत्सव आदींचा आढावा घेतल्यास लक्षात येते की, या काळात पूजली जाणारी दैवते, पाऊस आणि भूमी यांच्याशी निगडित आहेत.
 भोंडला या शब्दाची व्युत्पत्ती लोकवाङ्मयाच्या अभ्यासक दुर्गाबाई भागवत१६ यांनी चार प्रकारे मांडली. ती खालीलप्रमाणे -

भूमी आणि स्त्री
७७