हे पान प्रमाणित केलेले आहे.

भोवरा / १५३

राग येतो; वाईटही वाटते. पण त्यांचे काही चालत नाही. जी गोष्ट नाग लोकांची तीच इतर वन्य जमातींची. सर्व वन्य टोळ्यांमध्ये वन्य संस्कृतीच्या रक्षणाच्या नावाखाली आसामी लोकांच्याबद्दल द्वेष पसरवला जात आहे. आसामी विधिमंडळावरती तर सगळ्यांना जागा हव्यात, सरकारी नोकऱ्या हव्यात. पण आम्ही आसामी नाही, हा प्रत्येकाचा घोष चालू असतो. मी गेले त्याच सुमाराला आसामचा फुटबॉल संघ बंगालच्या फुटबॉल संघाशी खेळायला जावयाचा होता. ह्या संघात एक लुशाई खेळाडू होता. ह्या खेळाडूने जायच्या आदल्या दिवशी "मी आसामी नव्हे, लुशाई आहे." असे सांगून संघातर्फे खेळण्यास साफ नकार दिला. हा प्रकार घडण्याच्याआधी एक दोन दिवसच दिल्लीतील एक बडे प्रस्थ आसाम व मणिपूरच्या दौऱ्यावर होते व त्यांनी आपल्या भाषणातून खोऱ्यातील लोकांना उद्देशून त्यांना "टेकड्यांवरील जमातीची पिळवणूक करणारे" असे संबोधन वापरले होते. या सर्व गोष्टींचा ऊहापोह त्यादिवशी झाला. चालले आहे हे बरे नाही हे साऱ्यांनाच दिसत होते. पण सर्वच त्या बाबतीत अगतिक दिसले. मीही या विचित्र समस्येबद्दल अचंबा करीत माझ्या प्रवासी बंगल्यात परतले.
 दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे प्रवासाला सुरुवात झाली. गारो टेकड्या बऱ्याच दूर आहेत. माझ्या मनात शक्य तो दिवसा-उजेडी गारो प्रदेशाचे मुख्य शहर तुडा म्हणून आहे तेथे पोचायचे होते. गारो टेकड्यांच्या प्रदेशात पोचले की तुडाच्या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू होते. दुपारी १२ ते १ वरती जाणाऱ्या मोटारींसाठी रस्ता खुला होतो. ती वेळ चुकली की संध्याकाळचे सहा वाजेपर्यंत प्रवेश मिळत नाही. दुर्दैवाने त्या गावाच्या अलीकडे २५-३० मैल आमच्या मोटरची टायर फुटली. ती काढून नवी टायर बसवीपर्यंत खूपच वेळ गेला व घाटाच्या पायथ्याशी येईतो एक-दीड वाजून गेला होता. काही इलाज नव्हता, जवळच्या एका प्रवासी बंगल्यात ३-४ तास घालवले व संध्याकाळी सहाला घाट चढायला सुरुवात केली. थोड्याच वेळात अंधार पडला व घाटातून जाताना मला जे सृष्टिसौन्दर्य पाहायचे होते ते पाहता येईना. वाटेने जंगल भेटेल अशी कल्पना होती पण जंगल असे कोठे दिसेना. लहान लहान बांबू असलेल्या टेकड्या, तर काही वर नुसते गवत उगवलेल्या अशा टेकड्या दिसत होत्या. काही वेळाने लांबवर भलामोठा उजेड दिसला. मला वाटले चंद्र उगवला की काय, पण