हे पान प्रमाणित केलेले आहे.

जिवंत आहे की मेली ते पाहा. दया करा त्या अनाथ स्त्रीवर. ह्या मुलीच्या आईवर." मनूबाबा सद्गदित होऊन म्हणाला.

 दिगंबररायांच्या अंगणात गर्दी जमली. शेजारीपाजारी जमले. संपतराय या चिमण्या मुलीकडे पाहात होता. ती मुलगी घ्यावी असे त्याला वाटले.

 "ती स्त्री जिवंत असेल का?" त्याने घाबरत प्रश्न विचारला.

 "जिवंतपणाची लक्षणं नाहीत. परंतु डॉक्टरांना बोलवा. प्रयत्न करून पाहा." मनूबाबा म्हणाला.

 शेवटी मंडळी निघाली. डॉक्टरांना बोलावणे गेले.डॉक्टर अजून अंथरूणातच होते. आता कशाला उजाडत त्रास द्यायला आले,असे त्यांना वाटले. बाहेर गारवा होता. त्यांना सुखनिद्रा, साखरझोप लागली होती. परंतु लोकांनी हाकार करून त्याची झोप मोडली. डॉक्टर आदळ-आपट करीत आले तो समोर संपतराय दिसले!

 तुम्हीही आला आहात वाटतं? एवढ्या थंडीत तुम्ही कशाला बाहेर पडलात? तुम्ही श्रीमंत माणसं, सुकुमार माणसं. थंडी बाधायची. मी जातोच आता. पाहातो कोण पडलं आहे." डॉक्टर म्हणाले.

 "मीही येतो." संपतराय म्हणाला.

 "दयाळू आहात तुम्ही. तुमचं हृदय थोर आहे. अनाथासाठी कोण येणार धावत?" साळूबाई तेथे येऊन म्हणाली.

 त्या अनाथ स्त्रीजवळ सारा गाव जमला. डॉक्टरांनी नाडी पाहिली.... प्राण केव्हाच निघून गेले होते. अरेरे! त्या लहान मुलीला सोडून माता गेली. मुलगी जगात उघडी पडली.

 "या मुलीचं आता कोण?" डॉक्टर म्हणाले.

 "मी करीन. मनूबाबा, ती मुलगी मजजवळ द्या. आमच्या घरी, तोटा नाही, दाई ठेवीन, गडीमाणसं तिला खेळवतील, आंदुळतील, द्या ती मुलगी. कशी आहे सोन्यासारखी!" संपतराय म्हणाला.

 "नाही. मी कोणाला देणार नाही. हे माझं सोनं आहे. हे माझ्याकडे आलं आहे. ह्या मुलीचं आता सारं मी करीन. मी करीन."

 असे म्हणून मनूबाबाने तिला घट्ट धरून ठेवले. तिनेही विश्वासाने त्याच्या गळ्याला मिठी मारली. त्याने तिचे मुके घेतले.

३०* मनूबाबा