पान:मराठी लेखन-शुद्धी.pdf/37

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी लेखनशुद्धी




विरामचिह्नांचा अभ्यास


 शुद्धलेखनात विरामचिह्नांना विशेष महत्त्व आहे; पण आपण गंभीरपणे विरामचिह्नांची दखल घेत नाही आणि त्यांचा वापरही करीत नाही. मराठीत एकूण विरामचिह्ने किती असा प्रश्न विचारला तर मतभेद होतील वा त्याकडे लक्ष न पुरविल्यामुळे सांगणेही जड होईल. पण जाणकारांची अपेक्षा राहील की योग्य तेथे स्वल्पविराम वा अर्धविरामच असला पाहिजे. लेखनात याकडे फारसे लक्ष दिले जात नाही असे आढळते म्हणून येथे तपशीलवारपणे नित्याच्या परिचयाच्याच का होईना पण विरामचिह्नांचा अभ्यास सादर केला आहे.
१) पूर्णविराम किंवा संक्षेप चिह्न (.)
 अ) विधान किंवा वाक्य अर्थदृष्ट्या पूर्ण झाले हे दाखविण्यासाठी पूर्णविराम (.) हे चिह्न दिले जाते. उदा. : मी सकाळी उठते.
 आ) शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी आद्याक्षरानंतर पूर्णविराम (.) हे चिह्न दिले जाते. उदा. ता. क. = ताजा कलम; भा. व्यं. = भास्कर व्यंकट
२) अर्धविराम (;)
दोन्ही छोटी वाक्ये,'आणि, व, पण' इत्यादी उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतांना अर्धविराम (;) हे चिह्न दिले जाते. उदा. अभ्यासाला उशिरा सुरुवात झाली; पण ती पास झाली.
३) स्वल्पविराम (,)

अ) एकाच जातकुळातील किंवा समान अर्थी शब्द, प्रतिशब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम (,) हे चिह्न दिले जाते. उदा. फुले नाजुक, सुकुमार, सुंदर, हसरी असतात.



३४...