पंचांत सांपडला होता. त्यामुळे तंजावरच्या धनसंपन्न राज्यकर्त्याकडून द्रव्य
मिळविण्याचा त्याने संकल्प केला, आणि जुन्या खंडणीची बाकी काढून ती
वसूल करण्याच्या इराद्यानें तंजावरावर स्वारी करण्याचा त्याने घाट घातला.
तेव्हा हे प्रकरण मद्रासकर इंग्रजाकडे गेले; व त्या वेळचा मद्रासचा गव्हर्नर
मि. जार्ज पीगॉट हा मध्यस्थ होऊन त्यानें महंमदअल्ली व प्रतापसिंह यांच्या-
मधील खंडणीबाबतचा तंटा मिटविण्याचें कार्य आपल्या अंगावर घेतलें.
आपल्या कौन्सिलचा, मि. डुप्रे या नांवाचा एक सभासद त्यानें मुद्दाम
तंजावर येथे पाठवून या बाबतीत चौकशी करविली; आणि कर्नाटकच्या
युद्धांत तंजावरच्या राजाने इंग्रजास व महंमदअल्लोस बरेंच साहाय्य केले
असल्यामुळे सर्वांचा सलोखा होऊन देशांत शांतता नांदावी, या हेतूने त्याने
एक दोस्तीचा तह करण्याचे ठरविले; व इंग्रजांच्या मध्यस्थीने त्या उभयतो-
मध्यें, ता० १२ आक्टोबर इ० सन १७६२ रोजी एक दोस्तीचा तह
झाला. त्यामध्ये, “ तंजावरच्या राजानें जुन्या खंडणीबद्दलची बाकी, बावीस
लक्ष रुपये, ही दोन वर्षांत हप्तेबंदीने नवाबास द्यावी व पूर्वापार चालत
आलेल्या वहिवाटीप्रमाणे, पेषकसीबद्दल दोन लक्ष व नजराण्याबद्दल दोन-
लक्ष मिळून चार लक्ष रुपये दरसाल देत जावें" असें ठरलें; व त्याबद्दलची
हमी इंग्रजांनी घेतली. परंतु ह्या अटी अर्थातुर झालेल्या नबाबास पसंत
पडल्या नाहीत. त्यामुळे त्याचा असंतोष कायम राहून हें खंडणीचे भांडण
तसेंच धुमसत राहिलें व या नंतर लवकरच त्याचे परिणाम विशेष विको-
पास गेले.
प्रतापसिंह हा त्यानंतर फार दिवस जगला नाही. प्रतापसिंहाने एकंदर
तेवीस वर्षे राज्य केले. परंतु बहुतेक सर्व कारकीर्द अस्वस्थतेची व धाम-
धुमीची झाली. या तेवीस वर्षांत त्याला अनेक प्रकारे अतिशय त्रास झाला..
निरनिराळी संकट ओढवली. नानाप्रकारच्या विवंचना कराव्या लागल्या व
आपला प्राण, आपली इज्जत व आपले राज्य जगविण्याकरितां त्याला अनेक
प्रकारे अश्रांत परिश्रम घ्यावे लागले. त्याने सतत तेवीस वर्षे राज्य केले,
पण खरें राज्यसुख त्याला निदान तेवीस दिवस तरी मिळाले असेल, असें
त्याच्या कारकीर्दीतील संकटपरंपरेवरून म्हणवत नाहीं. असा हा तंजावरचा