देशभरातील क्रांतिकारकांना आश्रय देत असल्याची शंका ब्रिटिश सरकारला आली. या संदर्भातील माहिती मिळवण्याचा प्रयत्न ब्रिटिश गुप्तहेरांनी केला; परंतु त्यांना यश आले नाही. वास्तविक ब्रिटिश सरकारचा संशय खरा होता. या प्रदर्शनाच्या निमित्ताने काही बंगाली क्रांतिकारक नवसारीत आले होते. स्वदेशी वस्तूंच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळीच्या कार्याचा प्रसार करण्याची सयाजीरावांची युक्ती हा राजद्रोह आहे हे सिद्ध करणे ब्रिटिश सरकारला अखेरपर्यंत शक्य झाले नाही.
केशवराव देशपांडे आणि खासेराव जाधव या दोघांचा राजद्रोही चळवळीच्या लोकांना पाठिंबा असल्याने, सयाजीरावांनी त्यांच्याविरुद्ध चौकशी करावी यासाठी गव्हर्नर आणि व्हॉइसराय यांच्याकडून दबाव वाढला. केशवराव चांदोद येथील गंगनाथ भारतीय राष्ट्रीय विद्यालय, अरविंद घोषांची ' भवानी मंदिर' आणि प्रो. माणिकरावांचा आखाडा या राजद्रोही चळवळींच्या कार्यात सहभागी होते. या सगळ्या बाबींकडे रेसिडेंट कॉब आणि ब्रिटिश सी. आय. डी. लक्ष ठेवून होते. या दरम्यान काही पुरावे समोर आल्याने रेसिडेंट कॉब यांनी केशवरावांना सेवेतून काढून टाकण्याची मागणी केली.
सयाजीरावांनी केशवराव देशपांडे यांच्याविरुद्ध असलेल्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश देत, विनाचौकशी