फक्त आपले संस्थानच नव्हे तर आपले राष्ट्रही ज्ञानसंपन्न, वैज्ञानिक दृष्टीचे बनावे आणि काळाबरोबर उत्क्रांत होत जगातील प्रगत राष्ट्रांच्या पंगतीत बसावे ही विशाल दृष्टी ठेवून आपली ६४ वर्षांची कारकीर्द राबविणाऱ्या सयाजीरावांच्या जवळपास जाऊ शकेल असा एकही प्रशासक अथवा राज्यकर्ता आधुनिक भारताच्या इतिहासात सापडत नाही. त्यांच्या या विशाल दृष्टीचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्राने घेतला याची साक्ष देणारी शेकडो उदाहरणे सापडतात. परंतु महाराष्ट्रातील प्रबोधन परंपरेचा अभ्यास करणारे अभ्यासक आणि इतिहास संशोधक मात्र त्यांना 'ते बडोद्याचे होते' असे म्हणून गेली ६० वर्षे कोपराने
मागे ढकलत आले. ही बाब पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्राच्या गाफिलतेची साक्ष देते.
यशवंतराव : सयाजीरावांचे वारसदार
१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर सयाजीरावांचा वारसा कृतीत आणणाऱ्या यशवंतराव चव्हाणांनी घेतलेला पहिला निर्णय म्हणजे १९ नोव्हेंबर १९६० महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना होय. अशा प्रकारची संस्था स्थापन करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य होते. हे मंडळ म्हणजे महाराजांनी बडोद्यात मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी केलेल्या विविध प्रयत्नांचे एकत्रीकरण होते. १९६३ च्या सयाजीरावांच्या