पान:महाराजा सयाजीराव आणि महात्मा गांधी.pdf/१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दांडी यात्रेला सहकार्य

 महात्मा गांधी यांनी दांडी येथे उचललेल्या मिठामुळे ब्रिटिश साम्राज्याचा 'पाया' खचला. मार्च १९३० मध्ये मिठाच्या सत्याग्रहासाठी काढण्यात आलेल्या दांडी यात्रेवेळी बडोदा संस्थानच्या हद्दीत गांधींना अटक करण्यासाठी ब्रिटिश सरकारकडून बडोदा संस्थानवर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. बडोदा संस्थानच्या हद्दीत गांधींना अटक करण्याच्या बदल्यात ‘रावबहाद्दूर' किताब मिळवून देण्याचे आमिष सुरतचे ब्रिटिश जिल्हाधिकारी ग्राहम यांनी बडोदा संस्थानातील नवसारी जिल्ह्याचे तत्कालीन सुभे नाडकर्णी यांना दाखवले. नाडकर्णी यांनी ही बाब महाराजांच्या कानावर घातली. तेव्हा 'आमचा तुम्हाला नैतिक पाठिंबा आहे; पण आपण बडोदा मुलुखात कृपया काही स्फोटक बोलू नका' असा निरोप सयाजीरावांनी गांधींना पाठवला. त्यावर गांधींनी महाराजांना 'काळजी न करण्यास सांगितले. त्याचवेळी सयाजीरावांनी नाडकर्णीना गुप्त आदेश देऊन नवसारी जिल्ह्याच्या हद्दीत गांधींना अटक करून बडोद्याच्या प्रतिष्ठेला कलंक न लावण्याची ताकीद दिली. पेटलाद येथे गांधीजी आले असता बडोदा संस्थानच्या हद्दीतील पेटलादचे तहसीलदार सत्यव्रत मुखर्जीनी पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले. त्याचप्रमाणे बडोदा संस्थानात इतर अनेक ठिकाणी नागरिक आणि बडोदा सरकारातील अधिकाऱ्यांनी गांधींचे स्वागत केले. महाराज आणि गांधी यांच्यातील 'योग्य

महाराजा सयाजीराव आणि महात्मा गांधी / १३