धर्मातील समजुतीमुळे १७८२ पासून बडोद्याच्या राजवाड्यात दररोज ब्राह्मण भोजनाची प्रथा सुरू झाली. कालांतराने या भोजनासाठी येणाऱ्या लोकांची संख्या वाढू लागली. त्यामुळे १८०८ पासून या भोजनपंक्तीऐवजी महाराष्ट्रीयन ब्राह्मणांना २ भाग तांदूळ व १ भाग डाळ या प्रमाणात कोरड्या खिचडीचा शिधा देण्यास सुरुवात झाली.
सयाजीरावांचे दत्तक वडील खंडेराव महाराजांची इस्लाम धर्मावर विशेष श्रद्धा असल्यामुळे १८५८ मध्ये मुसलमान लोकांना भोजन देण्यासाठी ग्यारमीचा कारखाना सुरू करण्यात आला. यात दररोज येतील तितक्या मुस्लिम लोकांना भोजन देण्यात येई. ग्यारमी (मुसलमानी महिन्याचा ११ वा दिवस) व एकविसमी (मुसलमानी महिन्याचा २९ वा दिवस) दिवशी मुसलमानांना पुलाव व रोकड चिराखी (दक्षिणा) देण्यात येत असे. अन्नदान करत असताना व्यक्तीची गरज व उदरनिर्वाहाची अपरिहार्यता लक्षात घेतली जात नसल्यामुळे या भोजनाचा लाभ गरजूंबरोबर दरबारातील मानकरी लोकदेखील घेत. त्यामुळे महत्पुण्यासाठी केले जाणारे हे दान सत्पात्री होत नव्हते. १८७७-७८ मध्ये खिचडी व ग्यारमीवर ३,७१,६५२ रु. खर्च करण्यात आले होते. राज्याच्या उत्पन्नातील मोठा भाग या प्रथेवर विनाकारण खर्च होत होता.
राजवाड्यात चालत आलेल्या या अन्नदान प्रथेमध्ये सयाजीरावांनी बदल करत या प्रथेवर होणारा खर्च कमी केला. सयाजीरावांना त्यांच्या शिक्षकांकडून मिळालेले या संदर्भातील