जातीचे अनाथ, अपंग जेवले तर त्यापासून मिळणारे पुण्य आणि समाधान जास्त आहे अशी भूमिका घेतली. कालांतराने वेदोक्ताचा विषय बडोद्यातून कायमचा हद्दपार झाला.
२८ मार्च १८९८ ला उमरठ येथे युवराज फत्तेसिंहराव, जयसिंहराव, शिवाजीराव या राजपुत्रांबरोबर भाऊसाहेब गायकवाड व त्यांचे बंधू पिलाजीराव आणि मे. विश्वासराव घाडगे यांचे उपनयन विधी वेदोक्त पद्धतीने केले. या विधीवर २३,२९९ रु. खर्च झाला. या मुंजींच्या स्मरणार्थ सयाजीरावांनी उमरठ येथे मारुतीचे मंदिर बांधण्यासाठी १०,००० रुपये मंजूर केले. पुढे १६ मार्च १९०५ ला राजपुत्र धैर्यशीलराव आणि इतर सात मुलांची मुंज लक्ष्मीविलास राजवाड्यात झाली. महाराजांनी या प्रकरणाच्या निमित्ताने धर्माच्या नावाखाली चालू असलेल्या फसवणुकीबाबत लोकांना विचार करण्यास भाग पाडले. त्याचबरोबर काही धर्मविषयक ग्रंथांची निर्मितीही केली. एकंदर धर्मसुधारणेसाठी हे वेदोक्त प्रकरण उपयुक्त ठरले.
सर्व जातींना धार्मिक शिक्षण
सयाजीरावांनी १८८१ मध्ये राज्याधिकार प्राप्त झाल्यानंतर लगेचच आपल्या सामाजिक व धार्मिक सुधारणांच्या कार्यक्रमास सुरुवात केली. याच कालखंडात महाराष्ट्रामध्ये सामाजिक सुधारणांच्या प्रयत्नास सुरुवात झाली होती. पुण्यामध्ये महात्मा फुले, गंगारामभाऊ म्हस्के यांसारखे सत्यशोधकी सुधारणा घडवत होते. मामा परमानंद यांच्या शिफारशीवरून १८८४