पान:महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते.pdf/४४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अधिकार, एकमेकांबद्दलची जबाबदारी व लग्नसंबंधाची अविछिन्नता या सर्व गोष्टी निश्चित करण्यात आल्या. हिंदू विवाह कायदा करणारे बडोदा हे ब्रिटिश भारत आणि ५६५ संस्थानातील पहिले संस्थान होते. या कायद्यात १९२८ मध्ये केलेल्या सुधारणेनुसार लग्न विधीच्या वेळी जे वैदिक मंत्र म्हटले जातात त्यांचा अर्थ पुरोहिताने वधू-वरांना त्यांच्या मातृभाषेत सांगणे बंधनकारक केले. तसे न केल्यास त्याला ५०रु. दंड करण्याची तरतूद केली. अशा प्रकारची तरतूद असणारा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर भारतात आजअखेर एकही कायदा अस्तित्वात आला नाही.

 हिंदू परंपरेनुसार वधूच्या पित्याचे गोत्र व प्रवर हे पतीच्या गोत्र प्रवराहून भिन्न असणे गरजेचे होते. १९३२ मध्ये या कायद्या केलेल्या दुरुस्तीनुसार हे निर्बंध काढून सगोत्र विवाहास कायदेशीर मान्यता देण्यात आली. १४ वर्षांनंतर १९४६ मध्ये ब्रिटिश भारतात लागू करण्यात आलेल्या Hindu Marriage Disabilities Removal Act मध्ये समान गोत्र व प्रवराच्या व्यक्तींच्या विवाहाला परवानगी देण्यात आली. स्वतंत्र भारतात १९५५ मध्ये Hindu Marriage Act संमत करण्यात आला. या कायद्यात विवाहासाठीचे विधी आणि पद्धती निश्चित करण्यात आल्या. त्याआधी ५० वर्षे १९०५ च्या हिदू विवाह कायद्यात सयाजीरावांनी हिंदू लग्नाच्या मूलतत्त्वांची व्याख्या करतानाच लग्न करणाऱ्या स्त्री-पुरुषांचे परस्परसंबंधातील हक्कदेखील निश्चित केले होते.

महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते / ४४