पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२९

हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
 

इंग्लंड यांना स्वतंत्र व्यक्तित्व आहे असे आपण म्हणतो. रशिया व अमेरिका यांचे व्यक्तित्व भिन्न आहे, चीन व भारत यांचे व्यक्तित्व भिन्न आहे, असे इतिहासकार सांगतात. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, गुजराथ, बंगाल, राजस्थान इ. प्रदेश भारत या एकाच राष्ट्रात आहेत. तरी या प्रत्येक प्रदेशाला स्वतंत्र व्यक्तित्व आहे असे मानले जाते. इतकेच नव्हे, तर या प्रदेशांच्या अभ्यंतरातील गोवा. विदर्भ, सौराष्ट अशा भूभागांचाही, आपल्याला स्वतंत्र व्यक्तित्व आहे, असा दावा असून तो पुष्कळ लोक मान्यही करतात. हे स्वतंत्र व्यक्तित्व कशामुळे आले असे विचारता, धर्म, परंपरा, शौर्यधैर्यादी गुण, विद्या, कला यांतील वैभव या गुणसमुच्चयाचा निर्देश केला जातो. यालाच संस्कृती असे म्हणतात. आणि या अर्थाने, अखिल मानवाची संस्कृती एकच आहे, या विधानाला जसा काही अर्थ आहे, तसाच, प्रत्येक राष्ट्राची संस्कृती निराळी आहे, यालाही अर्थ आहे.
 आणि केवळ अर्थ आहे एवढेच नव्हे, तर महत्त्वही आहे. सर्व मानव तेवढा एक या भावनेला मानवाच्या प्रगतीच्या दृष्टीने जसे महत्व आहे तसेच जर्मन निराळे, इंग्लिश निराळे, बंगाली निराळे, मराठा तेवढा निराळा, गुजराथी निराळे, त्यांची स्वतंत्र संस्कृती आहे, या भावनेलाही प्रगतीच्या दृष्टीनेच महत्व आहे. इतरांहून आम्ही निराळे आहो, श्रेष्ठ आहो, या भिन्नत्वाच्या जाणिवेतूनच मानवसमूहांचे कर्तृत्व उदयास येते व जोपासले जाते. आजपर्यंत या अस्मितेतूनच अनेक जमातींचे गुण उदयास येऊन संवर्धित झाले आहेत.

संस्कृतींचा समन्वय
 धर्म, वंश, भाषा, प्रदेश यांमुळे मानवांचे नित्य पृथक समूह बनत असतात आणि आपण निर्माण केलेल्या स्वतंत्र संस्कृतीचा त्या समूहांना अतिशय अभिमान असतो. तसे असणे योग्यही असते. त्यावाचून ती संस्कृती टिकणे शक्यच नसते. इतर मानव- समूह त्यांची पृथगात्मता नष्ट करून त्या समूहांची संस्कृती उच्छेदण्यास सदैव टपलेले असतात. अशा स्थितीत प्रत्येक मानवसमूह आपल्या पृथगात्मतेचे रक्षण करण्यासाठी प्राणार्पणही करण्यास सिद्ध होतो. पण वरील कारणांमुळे पृथक झालेला मानवसमूह दरवेळी स्वयंपूर्ण होऊन स्वतंत्रपणे जगण्यास समर्थ असतोच असे नाही. शिवाय शेजारी शतकानुशतके राहिलेले समाज या पृथगात्मतेच्या भावनेने परस्परांशी नित्य संघर्ष करून तिसऱ्या दूरच्या आक्रमकापुढे बळी पडण्याचाही संभव असतो. म्हणून जगातल्या बहुतेक भूभागांत प्रत्येक मानवसमूहाला शेजारच्या अन्य मानवसमूहांशी संबंध जोडून सर्वांनी मिळून एकात्म समाज घडविणे अपरिहार्य होऊन बसते. ही एकात्मता साधताना सर्व पृथक समूहांच्या पृथक संस्कृतींचा आदर करून त्यांचा समन्वय साधणारे धुरीण लाभले तर तो समाज खरा एकात्म आणि संघटित होतो व त्यामुळेच बलशाली होतो. नाहीतर एकात्मता साधत नाही व साधली तरी तिला