पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२०१

हे पान प्रमाणित केलेले आहे.

असावी. अशी तयारी ठेवली तरच हे प्रश्न सुटतील.
 या बाबतीत जर कुणी काही मखलाशी करायला लागलं तर त्याला ठणकावून सांगा की सरकार हे शेतकऱ्याच्या भल्याकरता नसतं, हा अनुभव आम्ही पंचवीस वर्षे घेतला. आता आमच्या स्वतःच्या पायावर उभं राहून आम्ही स्वाभिमानानं जगणार आहोत. आम्हाला मंत्री होण्याची इच्छा नाही, कारखान्याचे चेअरमन व्हायची इच्छा नाही, आम्हाला इतर नागरिकांप्रमाणे सन्मानाने आणि सुखाने जगता यावे एवढीच इच्छा आहे. याकरिता, शिवाजी महाराजांच्या काळाप्रमाणे, आवश्यक तर नांगर मोडून तलवार हाती घ्यायची तयारी आम्ही केली आहे.
 पंचवीस वर्षांपूर्वी मी जेव्हा हा शेतकरी स्वातंत्र्याचा जागर सुरू केला तेव्हा शरीरात जोम होता. आज गेल्या पंचवीस वर्षांतील दगदगीने, दरम्यानच्या काळातील आजाराने, शस्त्रक्रियांनी शरीर विकल झाले आहे; तुमच्यासमोर बोलायचे तरी बसूनच बोलावे लागते. आता, डोळे मिटायच्या आधी, पंचवीस वर्षांपूर्वी मी जो यज्ञ चालू केला त्या यज्ञाचं फळ म्हणून महाराष्ट्रातील शेतकरी ताठ मानेने आणि सन्मानाने जगायला लागला आहे हे दृश्य तुम्हा सर्वांच्या कर्तृत्वाने मला पाहायला मिळालं तर माझं आयुष्य सार्थक झालं असं मी मानेन.

(२५ मे २००२ - शेतकरी मेळावा, सांगली.)
(शेतकरी संघटक ६ जुलै २००२)

◼◼

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २०१