पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२४१

हे पान प्रमाणित केलेले आहे.

करीत आहे त्यांच्याकडेही लक्ष द्यायला पाहिजे. केरळ राज्यातदेखील दोनेक हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तेतर कापूसही पिकवत नाहीत आणि ऊसही नाही. त्यांची पिके आहेत काळी मिरी, हळद, सुपारी, नारळ, इ. कापसाचा शेतकरी आत्महत्या करतो याचे कारण आपल्याला समजू शकते. पण ज्या पिकांना सरकारी निर्बंधांचा जाच नाही अशी मिरी, हळद, सुपारी पिकवणारे शेतकरी आत्महत्या का करतात हे समजेना म्हणून मी पंधरा दिवसांपूर्वी केरळात गेलो आणि ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्यापैकी काहींच्या घरी जाऊन त्यांच्या नातेवाईकांना भेटून तेथील परिस्थितीचा अभ्यास केला. एका गावी गेलो तर तेथील सुपारीची झाडे सुरुवातीला शेंड्याला पिवळी पडू लागतात आणि मग त्यांच्या आधाराने वाढणाऱ्या मिरीच्या वेलींना घेऊन मुळापासून कोसळतात असे समजले. ज्या सुपाऱ्यांकरिता आणि मसाल्याच्या पदार्थांकरिता सात समुद्र पार करीत वास्को द गामा पहिल्यांदा कालिकतला उतरला ते मसाल्याचे आणि सुपारीचे पीक केरळातून हळूहळू नष्ट होत चालले आहे. सुपारी नाही, मिरी नाही मग शेतकऱ्याच्या हाती पैसा कसा येणार? शेतकऱ्यांना कर्जे फेडता येत नाहीत. मग बँकांनी वेगळाच मार्ग वापरायला सुरुवात केली. जमिनीचा लिलाव वगैरे करायचा नाही; भारत सरकारने दोनतीन वर्षांपूर्वी केलेल्या सिक्युरिटायझेशन ॲक्टचा वापर करून बँकांनी शेतकऱ्यांची जमीन आपल्या नावावर करून टाकली आणि पोलिसांची मदत घेऊन त्या शेतकऱ्यांना त्या जमिनीतून हुसकावून लावणेच नव्हे तर त्यांनी बांधलेल्या घरातूनही काढून लावायला सुरुवात केली. तिथे शंभरेक शेतकरी सत्याग्रह करीत बसले होते. केरळमध्ये शेतकऱ्यांची मजबूत संघटना नाही. मी आलो म्हटल्यानंतर त्यांना मोठा आधार वाटला, त्यांनी त्यांची सगळी कहाणी मला सांगितली. मी त्यांना शब्द दिला की कर्ज फेडता येत नाही म्हणून बँका शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातून आणि जमिनीतून काढून लावत असतील तर त्याविरुद्ध आंदोलन उभे करणे ही माझी जबाबदारी आहे. १९८० साली महाराष्ट्रातील उसाला भाव मिळत नाही म्हणून उसाचे आंदोलन उभे करण्याची माझी जितकी नैतिक जबाबदारी होती तितकीच नैतिक जबाबदारी सुपारीमिरीच्या शेतकऱ्यांकरिता उभे राहण्याची आहे.
 त्या उपोषणकर्त्यांच्या वतीने आम्ही तिथे ठराव केला की २९ ऑक्टोबरनंतर, एक दिवस जाहीर करण्यात येईल आणि त्या दिवशी तेथे केरळातील पाच ते दहा हजार शेतकरी जमा होतील. केरळमध्ये शेतकऱ्यांची संघटना नाही. पण त्या उपोषणाच्या जागी हजर असलेल्या शेतकऱ्यांनी 'कर्षक कोट्टायामा' या नावाने त्यांची संघटना झाल्याचे घोषित केले आणि, मी त्यांना आश्वासन दिले

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २४१