पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/५३

हे पान प्रमाणित केलेले आहे.

उलट्या क्रमाने अशी तीनही नावे एकत्रितपणे अशाकरिता घेतात की शेतकरी आंदोलनाला काहीही आर्थिक कार्यक्रम नाही, हे फक्त शेतकऱ्यांचा स्वार्थ साधणारे आणि नुसते शेतकरी नव्हे मोठ्या शेतकऱ्यांचा स्वार्थ साधणारा हा एक कट आहे असं भासवण्यामध्ये शहरातील ही वर्तमानपत्रं यशस्वी झालेली आहेत. याही गोष्टीची जाणीव आपल्याला ठेवली पाहिजे.
 म्हणजे, राजकारणात तीन गोष्टी महत्त्वाच्या घडल्या. संतुलित सरकार आलं; पण आता राजकारणातला सगळ्यात मोठा संघर्ष अयोध्यावादीविरुद्ध सोनियावादी यांच्यामध्ये होणार आहे आणि शेतकरी आंदोलन वाटत होतं, ते उलट संकुचित, एका समाजाचे, फक्त श्रीमंत शेतकऱ्यांचं आंदोलन आहे असं चित्र उभं केलं गेलं आहे.
 आर्थिक परिस्थिती
 आर्थिक परिस्थितीमध्ये काय बदल घडला? आर्थिक परिस्थितीमध्ये मोठा बदल घडला. शेतकऱ्यांना शेतीमालाला भाव मिळायला लागलेला नाही, हे उघड आहे. भारत आणि इंडियातली दरी वाढते आहे हेही खरं आहे; पण तरीदेखील एक फार महत्त्वाचा बदल घडला. शेतकरी आंदोलनाची दिशा ठरविण्याकरिता तो अत्यंत महत्त्वाचा आहे. १९७८ मध्ये दिल्लीमध्ये कांद्याचा भाव फक्त एक रुपया किलो झाला म्हटल्याबरोबर कांद्यावर सरकारने निर्यातबंदी लादली. आज परिस्थिती अशी की मधल्या काही काळामध्ये कांद्याचा भाव दिल्लीला सोळा रुपये किलो झाला तरी निर्यातबंदी घालण्याची सरकारची हिम्मत होऊ शकली नाही. का? कारण, नेहरूवादाचा बोजवारा वाजला आहे. नेहरू-अर्थव्यवस्थेचं दिवाळं निघालेलं आहे आणि त्याचा परिणाम असा झाला की देशावर जवळजवळ एक लाख कोटी रुपयांचं किंवा त्यापेक्षाही जास्त कर्ज असल्यामुळे देशाकडे आता परकीय चलन राहिलेलं नाही. जागतिक बँकेचं किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं कर्ज घ्यावं, तेव्हा घरामध्ये भाकरी तयार होते अशी परिस्थिती सगळ्या देशावर आलेली आहे. मग त्याच्यामध्ये मनमोहन सिंगांनी अंदाजपत्रक काढलं, उद्योगधंद्यांना उत्तेजना द्या, ज्याला उद्योगधंदे काढायचे असतील त्याला परवानगी द्या, परकीय भांडवलाला चुचकारा, मक्तेदारांना मोकळीक द्या. इ. इ. पण हे संकट असं सुटणारं नाही. वर्तमानपत्रांनी कितीही म्हटलं आणि मनमोहन सिंग आणि पी. व्ही. नरसिंह रावांनी कितीही फुशारक्या मारल्या तरी नवीन औद्योगिक धोरणामुळे हिंदुस्थानवर आलेलं आर्थिक अरिष्ट सुटण्याची सुतराम शक्यता नाही. नाणेनिधीचं एक कर्ज मिळालं, दर महिन्याला एकेक कर्ज मिळालं, त्या कर्जावर व्याज नसलं आणि कर्जाच्या परतफेडीची अट जरी नसली तरीसुद्धा आपलं संकट सुटू

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ५३