पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/७९

हे पान प्रमाणित केलेले आहे.

हल्ला केला तर तो परतवून लावा. आजच्या सरकारचे पोलिस एवढंच काम करीत नाहीत. चोरांना आणि दरोडेखोरांना सोडून बाकी सगळ्यांना पकडण्याचं काम पोलिस करतात.
 पायताण पायातच हवे
 सरकारचं काम कायदा व सुव्यवस्था ठेवणं एवढंच फक्त असायला हवं. म्हणजे, सरकार असणं आवश्यक आहे, सरकार काही बंद करून चालत नाही. घरामध्ये आपल्याला संडास लागतो ना? दिवसातलं जे थोडं अस्वच्छ काम करायला लागतं त्याला संडास लागतो. तसं समाजामध्ये काही चोर असतात. काही दरोडेखोर असतात; त्याच्याकरिता सरकार लागतं; पण सरकारची जागा म्हणजे घरातल्या शौचकूपासारखी आहे. त्या सरकारला दिवाणखान्यात जागा देऊ नका.
 सरकारकडे एवढंच काम द्या. आर्थिक बाबतीत हात घालू नका, शेतकऱ्याचा भाव पाडायचा प्रयत्न करू नका आणि ज्याला त्याला मानानं आणि सन्मानानं जगता येईल अशी परिस्थिती तयार होऊ द्या अशी सरकारला ताकीद द्या. आज न्यायालयाचे न्यायाधीश फालतू उपमंत्र्याला घाबरतात. परवा एका सभेत मी म्हटलं की, "उपमंत्री आले तर आमच्या विश्वविद्यालयाचे कुलगुरूसुद्धा वाकून वाकून नमस्कार करतात." त्या सभेत एक प्राध्यापक होते; तर ते म्हणाले, "शरदराव, तुम्ही आमचा फारच सन्मान केला. प्राध्यापक किंवा कुलगुरू हे उपमंत्र्याला घाबरतात असं तुम्ही म्हणालात म्हणजे आमचा फार मोठा सन्मान झाला. आम्ही तर उपमंत्र्याचा चपराशी आला तरीसुद्धा त्याच्यापुढे घाबरून वाकून वाकून उभे राहतो."
 ही नेहरूराज्याची परिणती. हे नेहरूराज्य संपून न्यायाधीश न्यायाधीशाप्रमाणे वागतील, प्राध्यापक विद्वान प्राध्यापक विद्वानांप्रमाणे वागतील; जे कुणी राजकीय नेते आहेत त्यांचे सगळे गुलाम अशी व्यवस्था राहणार नाही असं दुसरं गणराज्य आलं पाहिजे.
 महात्माजींचा संदेश दुसऱ्या गणराज्याचा
 आपलं भाग्य असं की आपला कार्यक्रम ९ डिसेंबरला मुंबईला झाला नाही, २६ जानेवारीला मुंबईला झाला नाही, या गांधीबाबांनी आपल्याला हाक मारली की, "अरे किती वर्षे झाली मी इथं वाट पाहतो आहे." गांधीवाद संपून नेहरूंचा अंमल चालू झाला तो नेहरूंचा अंमल संपलेला मला पाहू दे अशी या बाबाने आपल्याला हाक घातली म्हणून आपल्याला इथं जमायचा योग आला.
 मग हे दुसरं गणराज्य आणायचं कसं? सरकारने कोणत्याही आर्थिक बाबतीत

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ७९