पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/९३

हे पान प्रमाणित केलेले आहे.

गुलाम म्हणून जगणार नाही अशी प्रतिज्ञा घ्या."
 सरकार जर म्हणायला लागलं की कापूसखरेदीचा एकाधिकार आहे. दुसऱ्या राज्यात कापूस नेण्याचा तुम्हाला अधिकार नाही. तर शेतकरी संघटना तुम्हाला परवानगी देते की तुम्ही स्वतंत्र आहात. सर्व सरहद्दी तोडून आपला कापूस तुम्ही खुशाल दुसऱ्या राज्यांत घेऊन जा. त्याला कोणीही थांबवू शकत नाही.
 भातावर सरकार लेव्ही लावत असेल तर तुमचा हा हक्क आहे आणि कर्तव्यही आहे की भाताची लेव्ही सरकार अमलात आणू शकणार नाही हे तुम्ही पाहिलं पाहिजे. त्यासाठी जे जे काही करावं लागेल ते करा.
 दूध ओतून देऊ नका. सरकारने परवानगी दिली नाही तरी दुधाच्या प्रक्रियेचे उद्योग, कारखाने खुशाल काढा.
 सरकारने कपाशीचे रेचे घालण्याची परवानगी नाकारली आहे. शेतकरी संघटना तुम्हाला परवानगी देत आहे, जेव्हा लागेल तेव्हा रेचे काढा, काही चिंता न करता काढा.
 तुमचा माल पिकवणे, तुमचा माल विकणं, तुमच्या मालावर प्रक्रिया करणं हा अधिकार तुमचा आहे तो बजावा.
 तुमची जमीन कोणी काढून घ्यायला आलं, तुमची जमीन सार्वजनिक हिताकरिता संपादन केली आहे असं कुणी सांगायला आलं तर त्याला सांगा, "आम्ही सरकारचा हा हक्क मानीत नाही, आमच्या जमिनीतील एक इंचसुद्धा जमीन आम्ही सरकारला द्यायला तयार नाही. भूखंडखोरांच्या मौजा आता बंद."
 कृषि उत्पन्न बाजार समिती तुम्हाला जर सांगत असेल की, "आधी आमचे तीन टक्के पैसे कापा आणि मग तुमचा माल विका" तर त्यांना सांगा, "तुमची मक्तेदारी आम्हाला मान्य नाही. कारण खुली व्यवस्था आलेली आहे. कारण आम्ही खुल्या व्यवस्थेतले स्वतंत्र शेतकरी आहोत. आम्ही तुमचं म्हणणं मानत नाही."
 उसाचा भाव पडत असताना साखर कारखान्याला ऊस घाला म्हणून कोणी सांगू लागलं तर, ऊसउत्पादक शेतकऱ्यांनो, तुम्हाला जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा गुऱ्हाळं घाला, गूळ तयार करा आणि साखर कारखाना अजिबात उरला नाही तरी चालेल.
 या पुढाऱ्यांची, राजकारण्यांची मक्तेदारी मोडून काढायची असली तर साखर कारखान्यांच्या नव्हे तर बाकी सगळ्या सहकारी संस्थाच्या सदस्यांना मी शेतकरी संघटनेचा आदेश देतो की तुम्ही आपल्या जनरल बॉडीची बैठक बोलवा आणि त्या जनरल बॉडीमध्ये ठराव मांडा-

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ९३