पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/43

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असे त्यांना वाटते. सुंदर स्त्रीचे आकर्षणच इतके मोठे असते की तिच्या ठिकाणी कोणताही दुर्गुण असेल अशी कल्पनाच आपल्याला करवत नाही, असे जर कुणी म्हटले तर कोल्हटकर त्याला लंपट म्हणतील.

खलनायकांवरील आक्षेप
  कोल्हटकरांच्या नाटकांवर असा एक आक्षेप आहे की, त्यांचे खलनायक भित्रे व मूर्ख असतात. ज्यांच्या दुष्टतेची भीती वाटावी, चिंता वाटावी तीच माणसे हास्यास्पद व फार गंभीरपणे घेण्याजोगी नाहीत असे प्रेक्षकांना वाटू लागले तर फारच रसभंग होतो. हे कोल्हटकरांच्या नाटकात नेहमी होते. अशी रचना कोल्हटकर जाणीवपूर्वक करतात. या रचनेचे ते समर्थनही करतात. त्यांचे म्हणणे असे की, खलनायक भित्रा असणे प्रेक्षकांना सद्गुणी करण्यासाठी आवश्यक आहे आणि दुर्गुणांचा पाडाव व्हावा ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तो मूर्ख ठेवणेही आवश्यक आहे. शेक्सपियरची सर्व नाटके एका झटक्यात सद्गुणप्रसाराला अडथळा आणणारी ठरविणारा हा निकष आहे. कोल्हटकर खलनायक नेहमी शकारच असला पाहिजे असे मानतात की काय कोण जाणे.

किर्लोस्कर-कोल्हटकर साम्यभेद
  करंदीकरांनी कोल्हटकरांच्या नाटकावर किर्लोस्करांच्या सुखांतिकेचा किती गाढ परिणाम अंतरंगाच्या दृष्टीने आहे याकडे अतिशय मार्मिकपणे लक्ष वेधले आहे. त्यामुळे नाटककार म्हणून त्यांचा विचार करताना स्तुतीला पुष्कळच मुरड घालावी लागेल. पण किर्लोस्कर व कोल्हटकर यांच्यातील एक फरकही महत्त्वाचा आहे. तो करंदीकरांनी नोंदविलेला नसला तरी महत्त्वाचा आहे. किर्लोस्कर पुराणांमधील अनेक कथांना अगदी कौटुंबिक व वास्तववादी रूप देण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोल्हटकर वास्तव समस्यांना स्वप्नात नेऊन सोपी उत्तरे देत आहेत हे विसरता येत नाही. किर्लोस्कर फार मोठे व्यासंगी पंडित नसतील, पण त्यांना वाङ्मयात भावनेचे महत्त्व कळते. कोल्हटकर भावनेचे फारसे महत्त्व ललित वाङ्मयातही मानावयास तयार नाहीत हेही चिंतनीय म्हटले पाहिजे.
  श्रीपाद कृष्णांना कविता, नाटक हे वाङ्मय प्रकार फारसे यशस्वी रीतीने हाताळता आलेले नाहीत. त्यांच्या सामर्थ्याचा प्रकर्ष जाणवतो तो विनोदी

४२ / रंगविमर्श