पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/137

हे पान प्रमाणित केलेले आहे.



पहिला मौलाना :- माझ्या कायद्याप्रमाणे मी वागलो आहे असे सांगावे आणि होईल ती शिक्षा भोगावी.

मी   :- यातून मूळ प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. मुसलमानांना त्यांच्या धर्माचे कायदे सध्याच्या राज्यात पाळता येत नाहीत असे तुमचे म्हणणे दिसते. मुसलमानांनी यातून मार्ग कसा काढावा हे आपण सांगाल काय?

पहिला मौलाना :- प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी मुसलमान जेहादचा मार्ग अवलंबतात. आम्हीही तेच करू.

मी   :- मी आता आपले लक्ष आपण सुरुवातीला घेतलेल्या भूमिकेकडे वळवितो. आपण म्हटलेत की तबलीग जमात राजकारण करीत नाही. मग जेहाद कसे काय करणार?

पहिला मौलाना :- तुम्हाला काही समजत नाही. सांगून उपयोगाचेही नाही. राजकारण करीत नाही हे सांगणे हेच तबलीगचे मोठे राजकारण आहे. आम्ही काहीही न बोलता हिंदुस्थानचा नकाशा बदलण्याचे कार्य तबलीगमार्फत करीत आहोत.

 तबलीग जमातीच्या मौलानांचे मनोगत समजण्यासाठी मी हे संभाषण जसेच्या तसे दिले आहे. वस्तुत: तबलीगमध्ये जमाते इस्लामी, जमायते उलेमा, अहरार अशा सर्वच वहाबी धार्मिक संघटनांचे मौलाना सामील झालेले आहेत. ते तेथे आपले कडवे वहाबी धर्मकारण करीत नाहीत हे म्हणणे हास्यास्पद आहे. केवळ धर्म शिकविणे किंवा मुसलमानांना त्यांचा धर्म समजावून देणे या तबलीगच्या मौलानांच्या उद्दिष्टांचा अर्थ एका विशिष्ट संदर्भात समजावून घेतला पाहिजे. धर्माची व्याप्ती कोणती? या धर्माचा तबलीगच्या नेत्यांना कोणता अर्थ अभिप्रेत आहे? कुराणाचा मौ. आझाद यांनी लावलेला व्यापक अर्थ तबलीगच्या नेत्यांना मान्य नाही. त्यातील बहतेक सगळे मौ. हसेन अहमद मदनी आणि मौ. मौदुदी यांची धार्मिक विचारप्रणाली मानतात. गुजरातेत फार मोठ्या प्रमाणात मुस्लिम तरूण वर्ग आकर्षित करण्यात तबलीगने वश मिळविले आहे.
 कडव्या धर्मनिष्ठेवर आधारलेल्या इतर काही संघटनाही ह्या काळात निर्माण झाल्या किंवा पुनरुज्जीवित करण्यात आल्या. फाळणीनंतर पंजाबातील दंगलीमुळे अहरार पक्षाचे सर्व नेते व कार्यकर्ते पाकिस्तानात गेले. त्यामुळे तो पक्ष येथे राहिला नाही. हैदराबादच्या पोलिस अॅक्शननंतर इत्तेहादुल मुसलमीन या संघटनेच्या रझाकार या स्वयंसेवक संघटनेवर बंदी घालण्यात आली. तिचे प्रणेते श्री. कासिम रझवी यांची कैदेतून सुटका झाल्यानंतर ते पाकिस्तानात घूिन गेले. परंतु जाण्यापूर्वी इत्तेहादुल मुसलमीनचे त्यांनी पुनरुज्जीवन केले. इत्तेहादुल मुसलमीन हळूहळू हैदराबादच्या राजकारणात संघटित होऊ लागली. हैदराबाद येथे इत्तेहादुल मुसलमीनच्या काही कडव्या अनुयायांनी तामिरे-मिल्लत ही संघटना काढली. या संघटनेचे प्रणेते खलिलुल्ला हुसेन यांनी तर एकदा मुसलमानांच्या संरक्षणाकरिता आपण अलिसेना काढणार आहोत असे जाहीर केले. १९६८ साली तामिरे मिल्लतचे औरंगाबाद येथे एक अधिवेशन झाले. या अधिवेशनात खलिलुल्ला हुसेन यांनी केलेल्या भाषणाच्या वृत्तपत्रातील

१३६/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान