पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/159

हे पान प्रमाणित केलेले आहे.

गांधींनी या लढ्याला पाठिंबा दर्शविताच त्यांच्यावर या मंडळींची नाराजी झाली. कालपर्यंत ज्या इंदिरा गांधी मुस्लिम हिताच्या काळजी वाहणाऱ्या होत्या त्या आता 'रेडियन्स'च्या मताप्रमाणे जनसंघाची भूमिका धारण करणाऱ्या ठरल्या.
 बांगला देशच्या सबंध पेचप्रसंगात मुस्लिम नेत्यांनी, वृत्तपत्रांनी आणि संस्थांनी धारण केलेली भूमिका सर्वस्वी पाकिस्तानधार्जिणी होती; बद्रुद्दिन तय्यबजी यांची आधी चर्चिलेली भूमिका आणि सर्वसामान्य मुस्लिमांची भूमिका यांत कोणताही फरक नाही. पाकिस्तानच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करू नये, बांगला देशाच्या लढ्याला पाठिंबा देऊ नये, निर्वासितांना येऊ देऊ नये, आलेल्या निर्वासितांना सक्तीने घालवून द्यावे आणि सीमा बंद करावी, अशा त्यांच्या सूचना आहेत. सीमा बंद करावी म्हणजे काय करावे? सुमारे पावणेदोन हजार मैलांची ही सीमा होती. एवढ्या सीमेवर विजेरी तारांचे कुंपण घालणे अथवा पूर्व जर्मनीने बांधली तशी प्रचंड भिंत बांधणे हे सीमा बंद करण्याचे काही उपाय आहेत. येणाऱ्या निर्वासितांवर निष्ठरपणे गोळ्या झाडणे हा येणाऱ्या निर्वासितांना थांबविण्याचा एक मार्ग होता. निर्वासित हजारोंच्या आणि लाखोंच्या संख्येने येत होते. याचा अर्थ गोळीबार करून हजारोंना कंठस्नान घातल्याखेरीज निर्वासितांचा ओघ थांबविणे शक्य नव्हते. अशा प्रकारे हजारोंना ठार करून निर्वासितांना यायला मज्जाव करायला हवा होता काय? पुढे भारतीय मुसलमानांवर बांगला देशमध्ये अत्याचार झाल्याच्या बातम्या आल्या तेव्हा याच नेत्यांनी 'त्यांना भारतात आणावे' अशी मागणी केली. भारत हा बहुधा मुसलमानांना धर्मशाळा म्हणून वापरण्याची जागा आहे अशी या मंडळींची समजूत झालेली दिसते! (मुस्लिम लीगचे नेते (पै.) महमद इस्माईल, तसेच सुलेमान सेठ, मुस्लिम मजलिसचे डॉ. ए.जे. फरीदी, शेख अब्दुल्ला इत्यादी मंडळींचा यात समावेश होतो. त्यांनी असंख्य ठिकाणी तशी वक्तव्ये केली आहेत. जमायत-उल-उलेमा, जमाते इस्लामी, तामिरे-मिल्लत व सर्वच मुस्लिम संघटनांची आघाडी असलेली मुस्लिम मशावरत यांचीदेखील भूमिका हीच होती. त्यांनी केलेले अधिकृत ठराव पहाणे या दृष्टीने उद्बोधक ठरेल.)

 १९६५ च्या एप्रिलमध्ये पाकिस्तानने प्रथम कच्छवर हल्ला केला आणि सप्टेंबरमध्ये काश्मीरच्या लढाईला तोंड लागले. हे युद्ध चालू असताना भारत सरकारला आमचा पाठिंबा आहे' असे संदिग्ध पत्रक काढून हे सर्व मुसलमान नेते पुढे गप्प राहिले होते. भारत सरकारला या मंडळींचा नेमका कोणता पाठिंबा होता हे पुढे युद्ध संपल्यानंतर स्पष्ट झाले. युद्ध संपताच मजलिस-ए-मशावरतने एक ठराव करून भारत हा गौतमबुद्ध, नानक आणि चिस्ती यांसारख्या शांततेचे पाईक असलेल्या ऋषि-अवलिया आणि धर्मसंस्थापकांचा देश आहे याची भारतीय नेत्यांना जाणीव करून दिली आणि पाकिस्तानशी सलोखा झाला पाहिजे असे सुचविले. (चिस्तींचे नाव मुसलमानांतदेखील शांततेचे पाईक जन्माला येतात हे दर्शविण्यासाठी मशावरतने या ठरावात घेतलेले दिसते.) या ठरावाचा सर्व रोख भारताने पाकिस्तानबरोबर तडजोड करावयास सांगणारा आहे. पाकिस्तानने हल्ला केला याचा उल्लेख कुठेही नाही, पाकिस्तानचा निषेध नाही. थोडक्यात, पाकिस्तान जे मागते आहे ते देऊन तडजोड करण्याचा अनाहत सल्ला या ठरावात भारतीय नेत्यांना देण्यात आला होता. पुढे ताश्कंद करार झाला. या कराराने

१५८/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान