पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/52

हे पान प्रमाणित केलेले आहे.

निर्मितीचे कारण झाले. अलीगढ पाकिस्तानच्या चळवळीचा पाया आहे आणि पाकिस्तानची निर्मिती हे अलीगढ चळवळीचे अपयश आहे.
 धार्मिकदृष्ट्या उदारमतवादी असलेले तर सय्यद अहमदखान इतिहासाच्या पूर्वग्रहातून बाहेर पडले नाहीत. मुसलमानांना आधुनिक करणे एवढेच ते आपले जीवितकार्य मानीत नव्हते, त्यांना भारतीय राष्ट्रवादाच्या प्रवाहापासून अलिप्त ठेवण्याची भूमिकाही ते बजावीत होते. ते धर्मदृष्ट्या हिंदूंना काफीर लेखीत नव्हते. त्यांच्या मते मुसलमान जेते आणि हिंदू जित आहेत. धर्मदृष्ट्या ख्रिश्चन काफीर नाहीत असे त्यांनी म्हटले आहे. ख्रिश्चन धर्मदेखील ईश्वरी आहे. त्यांनाही ईश्वराने धर्मग्रंथ पाठविला आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले आहे. (पहा - (i) "Sayyid Ahmad Khan : A Reinterpretation of Muslim Theology" Christian W Troll - Vikas Delhi, 1978. pp. 73 to 85. (ii) "Tabyun-ul-Kalam" Sayyid Ahmad Khan, Ghazipur (India) 1862. (“एका मुसलमानाचे बायबलवरचे भाष्य" सर सय्यद अहमद खान, १८६२) (iii) "Sir Syed Ahmad Khan : A Political Biography" - Shah Muhammad, Meenakshi Publications, Meerut, 1969, p. 147) मात्र असे हिंदू धर्माविषयी म्हणावयाचे टाळले आहे. याची कारणे स्पष्ट आहेत. आपल्या ब्रिटिशधार्जिण्या धोरणाला अनुसरून मुसलमानांच्या मनात ख्रिश्चन धर्माविषयी आदर निर्माण करणे त्यांना आवश्यक वाटत होते. हिंदूंबाबत ती आवश्यकता त्यांना वाटत नव्हती. कारण हिंदूंबरोबरच्या समान संबंधाची, समान नागरिकत्वाची कल्पना त्यांना मान्य नव्हती. अखेर भारतीय अखंडत्वाचे तारू मुसलमानांनी अमान्य केलेल्या समान नागरिकत्वाच्या खडकावर आदळून फुटले आहे.

 त्यांना मुसलमानांकरिता खास हक्क हवे होते. ते खास हक्क ब्रिटिश जितके काळ राहतील तितका काळ मिळणे शक्य आहे असे त्यांनी मानले आणि यदाकदाचित ब्रिटिश गेलेच तर मुसलमानांतून पठाण, सय्यद, हाशमी आणि कुरेशी या मंडळींनी भारतावर पुन्हा राज्य करावे अशी त्यांची सुप्त आकांक्षा होती. ब्रिटिशांचा विश्वास संपादन करा आणि योग्य संधीची धीराने वाट पहा, असा सल्ला त्यांनी मुस्लिम बांधवांना १८८७ च्या डिसेंबरबमध्ये लखनौ येथे केलेल्या वरील भाषणात दिला आहे. (सर सय्यद अहमदखान यांच्या आधीच्या भाषणाचा हवाला देऊन ते हिंदू - मुस्लिम ऐक्याचे पुरस्कर्ते होते असे भासविण्याचा खटाटोप मुस्लिम प्रवक्ते करीत असतात. जीनांविषयीदेखील असाच युक्तिवाद केला जातो. खरे म्हणजे कुणाही व्यक्तीच्या विशिष्ट आणि आधीच्या उद्गारांवरून वा कृतीवरून त्यांच्या व्यक्तित्वाचे मूल्यमापन करावयाचे नसते. व्यक्तीचे सारे कार्य, कृती आणि उक्ती यांचे परिणाम यांवरून ते अजमावयाचे असते. मुस्लिम प्रवक्ते मात्र आपल्या नेत्यांचे आधीचे साळसूद उद्गार उद्धृत करून त्यांना गौतमबुद्धाच्या पंक्तीला बसवीत असतात. मात्र इतरांबाबत ते ही पद्धत अमलात आणीत नाहीत. सावरकर शेवटी जातीयवादी राजकारण करू लागले तेव्हा ते मात्र जातीयवादी होते किंवा वल्लभभाई १९४६ च्या जयपूर काँग्रेसमध्ये लीगच्या दंगलीच्या धमकावणीला 'तलवारीला तलवारीने उत्तर मिळेल' असे म्हणाले म्हणून ते मुस्लिमद्वेष्टे होते असे म्हणावयाचे हा मुस्लिम प्रवक्त्यांचा खाक्या असतो. त्यांनी इतरांबाबत 'नंतरचा आदेश आणि आधीचा

मुसलमानांच्या धार्मिक चळवळी /५१