या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मुकादम आता आपल्याकडे पाहिल्यासारखं अभिलाषी नजरेनं पाहात नाही. का? या प्रश्नानं ती बावरली आणि कानात त्याच वेळी हणमंताचे ते बोल घुमू लागले. आता आपण पूर्वीसारखे आकर्षक राहिलो नाहीत? देहाची पुष्टाई अन् गोलाई कष्टाच्या कामानं कमी झाली आहे हे खरं.. त्यामुळे का आपलं स्त्रीत्व.. बाईपण अनाकर्षक होतं? हा पुरुषी कावा आहे. त्यांचा विकृत, ओंगळ दृष्टिकोन आहे. बाईमाणूस म्हणजे फक्त तिचं शरीर? त्यातलं मन, त्या मनाचं प्रेम.. निष्ठा काहीच नाही?
 हणमंता हा आपल्या कुंकवाचा धनी. सारं काही आपण त्याला दिलं. हे शरीर तर त्याच्या हक्काचं आहे, पण हे मनही त्याला दिलं. त्याचं धन्याला काहीच अप्रूप नाही!
 आपल्या शरीरातला बदल त्याला जाणवला, पण मनातला केव्हा जाणवणार? ज्या क्रमानं शरीर झडत गेलं. त्याच क्रमानं मन उन्नत होत गेलं. अनुभवाच्या शाळेत शिकता शिकता, रोजगार हमीच्या कामावर मुक्त श्वास घेता घेता खूप काही समजून येतंय आणि मनात नाना प्रश्न उभे करतंय....
 हे सारं हणमंताशी गजरा कधी बोलली नव्हती. का? विचार करता तिच्या मनानं कौल दिला की, धनी हे कधी समजून घेणारच नाहीत. त्यांना फक्त देह कळतो, त्यात एक मनही असतं, हे त्यांना कधी समजून घ्यावंसं वाटतंच नव्हतं!
 मीच खुळी... सतत आपल्याभोवती धनी कबुतराप्रमाणे घुमायचे. माझ्या शरीराचे लाड लाड करायचे. आपण त्याला प्रेम.. प्रीती समजलो. संसार मानला. आपली ती चूक होती. तो केवळ वासनेचा उमाळा होता. शरीराची गोलाई कमी झाली, बांध्याचा उभार ढासळला आणि त्यांचं लक्षही उडालं...
 गेल्या कित्येक रात्री रंगल्या नव्हत्या. प्रत्येक वेळी तो असमाधानी, ती बेचैन. त्याचं कारण हे तर नसेल....?
 दिवसभर गजरा यंत्रवत गतीनं काम करीत होती, पण मनात हे असे विचार पुन्हा पुन्हा येत होते आणि मन प्रक्षुब्ध होत होतं.
 चारच्या सुमाराला मुकादमानं सांगितलं... आज मागच्या हप्त्याचा पगार होणार आहे. सा यांचे चेहरे फुलून आले. गजरालाही बरं वाटलं. कारण कालच घरातलं पीठ संपलं होतं. मीठ-मिर्ची पण जेमतेम होती. बरं झालं... कुपनावर रेशन दुकानात जाऊन गहू घेता येतील व इतर सामानही उद्या बाजारात खरेदी करता येईल...
 कमरेला गाठीत पैसा मारून गजरा वेगानं परतीच्या वाटेला लागली होती... घराची ओढ मनाला अधीर करीत होती... व्यंकूच्या आठवणीनं वात्सल्य उफाळून आलं होतं. हल्ली व्यंकूला जवळही घेता येत नाही. वेळेअभावी...

 औंदाचा मौसम जवळ येतोय. पीकपाणी ठीक झालं तर दैन्य कमी होईल. कदाचित रोजचं हे उरस्फोडी रोजगार हमीचं काम करायची पाळी येणार नाही. आराम

६४ ■ लक्षदीप