या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कनिष्ठ अभियंता वा मस्टर असिस्टंटपर्यंत संपर्क साधावा लागत होता.
 शिंदे तरुण होते, उत्साही होते व या वर्षीचा पडलेला दुष्काळ हे एक आव्हान समजून ते प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते, हे कलेक्टर जाणून होते व प्रसंगी मीटिंगमध्ये इतर तालुक्यांच्या तहसीलदारांना सांगत, “शिंद्याप्रमाणे तुम्हीही सामाजिक बांधिलकीची भावना मनात रुजवा. थोडा रेव्हेन्यू खाक्या विसरून काम करा...."
 आणि या पाश्र्वभूमीवर कलेक्टर जे फोनवर सांगत होते, त्यामुळे शिंदे अक्षरशः सुन्न झाले होते!
 " त्यांच्या तालुक्यातील काळगाव दिघी या गावाची एक मध्यमवयीन स्त्री रोजगार हमीचं काम न मिळाल्यामुळे उपासमार होऊन मृत्युमुखी पडल्याची बातमी आजच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती. सध्या राज्य विधिमंडळाचे अंदाजपत्रकीय अधिवेशन चालू होते व तालुक्याचे आमदार विरोधी पक्षाचे व रोजगार हमी योजनेच्या विधिमंडळ समितीचे सदस्य होते. त्यामुळे असेंब्लीमध्ये प्रश्न किंवा लक्षवेधी सूचना मांडली जाण्याची शक्यता होती.
 कलेक्टरांची काळजी व रागही रास्त होता. वृत्तपत्रात बातमी येईपर्यंत शिंद्यांना माहिती नव्हती, त्यामुळे वरिष्ठ पातळीवर कलेक्टरांना तोंड देणे अवघड होऊन बसले होते.
 “सर, या क्षणी मी काही सांगू शकत नाही, पण मी एक-दीड तासात सर्व माहिती घेऊन फोन करतो. आय अॅम एक्स्ट्रीमलीं सॉरी सर, पण - पण...."
 “ओके - इटस् ऑल राईट - चंद्रकांत. पण हे मॅटर तुला, मला जड जाणार आहे. मी आज रामपूरला आहे, तिथं मला फोन करून कळव. किंवा फोन नाही लागला तर चारनंतर सरळ माझ्याकडे हेडक्वार्टरला ये...."
 अक्षरशः दहा मिनिटाच्या आत रेणुकाच्या आग्रहाला न जुमानता शिंद्यांनी ब्रेकफास्टही न घेता कार्यालयात येऊन माहिती मिळवायला प्रारंभ केला. त्यांनी जीप पाठवून रोजगार हमीचे नायब तहसीलदार भालेरावांना तातडीने येण्यास सूचित केले व एक शिपाई पाठवून शेतकरी-शेतमजूर पंचायतीचे तालुका चिटणीस विसपुतेंना बोलावून आणण्यास सांगितले.
 कार्यालयात नेहमी नवाच्या आत येणारा एम. ए. जी. विभागाचा क्लर्क वाघमोडे सोडता शिंदे एकटेच होते व विचार करीत होते.
 गेल्या दोन महिन्यात ज्या ज्या गावातून कामाची मागणी आली होती, तेथे तेथे प्रत्यक्ष जाऊन तेथील मजुरांना त्या गटातच शक्यतो रोजगार हमीचे काम देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. ज्या ज्या मजुरांनी त्यांना काम मागितले होते, त्यांना लेखी पत्र देऊन सोईच्या कामावर पाठवले होते.

 तरीही काळगाव दिघीची एक महिला काम न मिळाल्यामुळे उपासमार होऊन

७० । लक्षदीप