पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/२४४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे: २३९

व शास्त्र करणाराचा मानस जाणावा म्हणजे ठीक होते. केवळ शब्द घेऊ नये. म्हणजे उघड सर्व दिसू लागेल व लोक ताळ्यावर येतील.
 कोणती मूर्खपणाची गोष्ट असो, परंतु त्यात दोन पैसे जर भटास मिळण्याचे असतील तर त्यांस अनुकूल होण्यास भट आळस करीत नाहीत. व गृहस्थ बोलून चालून मूर्ख म्हणवितात. वास्तविकच आहे की, त्यांस काही समजत नाही व वाचता देखील येत नाही. मग विचार करायचे दूरच आहे. याजकरिता भट हे अगदी नाहीसे झाले पाहिजेत व गृहस्थांनी व इतर जातीचे लोकांनी भटाचा नाद सोडून द्यावा. परंतु त्यांस ज्ञान आल्याखेरीज हे होणार नाही. त्यांस काही काळ पाहिजे.
 मोठी अविचारी म्हटली म्हणजे सांप्रत भट मंडळी आहे. त्यांस काही ठाऊक नसले तरी ते होय म्हणतात. व इंग्रज लोकांचे राज्य लंकेत आहे असे म्हटले तर खोटे म्हणतात. व पुराणातील उदाहरणे दाखवून समाधान करतात. आपला गर्व सोडत नाहीत. आपल्यास पूर्वीच्या विश्वामित्र जमदग्नीच्या तुळणा देतात. याजमुळे अनाडी लोक फारच भितात. आणि भटांचा आशीर्वाद हे मोठे उत्तम नाणे समजतात व त्यांस मोल देऊन ते खरेदी करतात. जर कोणी मेला तर जसे गयावळ यांनी 'सरक भयो' म्हटल्याखेरीज मुक्ती होत नही अशी समजूत आहे, तद्वत् भटांचेही माहात्म्य आहे.
 भट जेवल्याखेरीज कोणतीही गोष्ट पुरती होत नाही. जन्म, मरण, लग्न इत्यादी सर्वांस भट पाहिजेत. व ते नसतील तर अडाणी म्हणतात की अमका मेला पण भटांच्या तोंडात घास पडला नाही. असे समजून प्रयत्न करून खर्च करतात. म्हणून ही मोठाली श्राद्धे व गयावर्जने होतात. परंतु लोकांस असे वाटत नाही की, जो मेला त्याने जे कर्म बरेवाईट केले असेल त्याप्रमाणे त्यांस ईश्वरी फळ देईल. मग त्यांस गयेचे माहात्म्य काय? गयेस मोक्ष होतो तर तेथे गेल्याने तरी सुटका नाही. तेथील गयावळ यानी मोक्षाची परवानगी दिली पाहिजे. आणि मनुष्यास ते खरेच वाटते. म्हणून गयावळाचा संतोष करावयाकरिता हजारो रुपये देतात व तेही लुटून घेण्यास कमी करीत नाहीत. परंतु कोणी असे समजत नाही की, एक माणसाचे म्हटल्याने दुसरे माणसास मुक्ती कशी होईल? व हे कोण? त्याची आमची गती एक! मग त्याचे तोंडचे म्हटल्याने काय होते? परंतु हा सर्व मूर्खपणा आहे. भटांनी सर्वांस मोह घातला आहे व अज्ञानपाशाने बांधले आहे. ते ज्ञान आल्यावाचून सुटणार नाहीत.

♦ ♦