पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/७१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ६५

करू नये, ते फार वाईट, इहलोकी क्षणभर सुख वाटेल, परंतु त्याचा झाडा द्यावा लागेल. मरावयाचे आहे, हे नित्य मनात आणा.
 तुम्ही आपले मुलांची काळजी करून त्यास शहाणी करा, व सर्व लोकांची काळजी करा. नित्य काही तरी सर्व देशाचे कल्याण केल्याशिवाय एक दिवस जाऊ देऊ नका. मुख्य ईश्वरभजन करण्याचा मार्गच आहे की, कोणास दुःख देऊ नये, व सर्व लोकांचे हित करावे, स्वदेशाचे हित इच्छावे, आणि परदेशाची हानि इच्छावी असे नाही. परंतु सांप्रत आपले लोक फार वाईट अवस्थेत आहेत, सबब फार खबरदारी ठेवली की, या लोकांचे कल्याण होईल, तुम्ही आपल्यास योग्य करा, अब्रू वाढवा. पैका मिळाला तर अब्रू वाढते, असे नाही. अब्रू, खरेपणा व निर्मळपणा यापासून उत्पन्न होते.
 विद्या केली तर त्याप्रमाणे वागणूक पाहिजे. नाही तर विद्या व्यर्थ आहे. विद्येचे सार्थक रोजगार नव्हे. ज्यांस विद्येचा अर्थ ठाऊक नाही, ते असे म्हणतात. परंतु फक्त पोटच भरणारी विद्या नव्हे, ती मजुरी आहे. विद्या म्हणजे ज्ञान, जेणेकरून मनुष्य निर्मळ होतो, विचारी होतो, समर्थ होतो; उनाड जे लोक आहेत ते विद्येचे तात्पर्य द्रव्य मिळविण्याचे असे समजतात, परंतु विद्येपासून द्रव्यलाभही होतो व दुसरे अनेक लाभ होतात.
 याप्रमाणे तात्पर्य मी निरूपण केले. याप्रमाणे सर्वांनी चालावे आणि असे होण्यास माझे श्रम काही उपयोगी पडले असे दृष्टोत्पत्तीत आल्यास माझे श्रम परिहार होतील. माझे मागणे सर्व लोकांस आहे की, मी जे लिहिले आहे त्याचा विचार करून पहा. तुमच्या चांगल्यावाचून त्या लिहिण्याचा हेतू नाही. तुमचे कल्याण व्हावे म्हणून मी झटतो व तुमच्या चुका वगैरे उघड करून दाखविण्यात तुम्हास रागरोष येईल हे मी मनात आणले नाही. कारण की, माझी उत्कंठा तुमच्या सुधारण्याकडे फार आहे. माझे अंतःकरण सर्व तिकडे आहे. यास्तव मी जे लिहिले आहे, त्याचा तुम्ही विचार करावा. कारण की, जाणे तुमची सेवा एकनिष्ठेने व निष्कपटपणाने केली त्याजवर तुमची इतराजी नसावी. किंबहुना तो काय बोलतो, हे तरी मनन करावे. अस्तु. तुमची आमची गाठ आज दोन वर्षे सतत होती याचा मला मोठा आनंद सर्व काळ वाटेल. सर्वांनी कृपा लोभ असो द्यावा, ही विनंती.

♦ ♦