________________
४६ लोकहितवादी. राजकीय विषयावरील निबंध अशी अनेक लहान मोठी पुस्तकें छापून प्रसिद्ध केली. त्याप्रमाणेच प्रभाकर, इंदुप्रकाश, वृत्तवैभव वगैरे निरनिराळ्या पत्रांतून लिहिलेले लेख व पत्रव्यवहार यांचा संग्रह करून तो खंडशः प्रसिद्ध करावयाची योजना त्यांनी केली होती. त्याप्रमाणे एक खंड बाहेर पडला. लोकांस घेण्यास सुलभ पडावें म्हणून किंमत खर्च भागेल इतकीच म्हणजे मोठ्या सांचाच्या शिळा छापावरील सुमारे ११०० पानांच्या पुस्तकास चार रुपये ठेविली व तीही नांवाची होती. कारण आपल्या मतांचा प्रसार व्हावा म्हणून ते या पुस्तकाच्या प्रती फुकटही वाटीत. त्याचप्रमाणे ब्राह्मणांना आपल्या नित्यकर्माची माहिती व्हावी, आपलें मुख्य कर्म में विद्यार्जनअध्ययन व अध्यापन-तें या वर्गातील लोकांनी व बदललेल्या काळास अनुसरून अशा रीतीने यथास्थीत करावे म्हणून ब्रह्मकर्म अथवा स्वाध्याय या शब्दाची थोडीशी व्यापक व्याख्या करून त्या विषयावर त्यांनी एक ग्रंथ लिहिला व त्यांत.आपल्या देशांतील समाजाच्या हिताहिताचे जे निरनिराळे प्रश्न म्हणून त्या वेळी प्रचलीत होते त्यावरील आपले विचार जोरदार व स्पष्ट शब्दांनी प्रसिद्ध केले. माझ्या मताने शतपत्री व स्वाध्याय या दोन ग्रंथांना थोडेसें विशेष महत्त्व आहे. इतर ग्रंथ माहितीने भरलेले व उपयोगी आहेत. पण लोकहितवादींची विशिष्ट मते व प्रतिपादनाची विशिष्ट शैली या गोष्टी या दोनच ग्रंथांत दिसतात. म्हणून इतर पुस्तकांचे जरूरीपुरते व या दोहींचें विस्तृत असे परीक्षण करावे लागेल. ते पुढील प्रकरणांत करूं. तूर्त त्यांच्या खाजगी चरित्राकडेच पुन्हां वळतो. या दहाबारा वर्षांतील सांगावयाच्या ठळक गोष्टी म्हटल्या म्हणजे दोन. एक रतलामची दिवाणगिरी व दुसरी म्हणजे त्यांच्यावर आलेल्या कौटुंबिक आपत्ती. दयानंदस्वामींचा व गोपाळरावजींचा परिचय अहमदाबादेसच