पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/41

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कोपरखिळे सांभाळ आता हो रे हुशार।
छाती धरुनी देतो टोले करितो बजार
मान मोडीन कंबर तोडीन नको करू वैर।

 अशा प्रकारचे वर्णन येते.  पूर्वी सवाल जवाब वा चढ उतारीच्या लावण्यावर प्रेक्षक खूष असे. त्यांची ती बौद्धिक करमणूक असायची. तमाशाच्या फडात रात्र रात्र सवाल-जवाब रंगायचे. जिंकलेल्या पक्षाला बक्षीसी दिली जायची. शिवाय विजयामुळे त्या शाहिराची प्रतिष्ठाही वाढायची.
 शाहीर हैबतीने अशी एक सुंदर रचना केली आहे.
 चढ लावणीत अथवा सवालात तो लिहितो

एक अचंबा असा दिसाचे चंद्र पाहिले चार।
चारी चंद्र सारखे सारखा नामाचा उच्चार।
चार चंद्र कोणते तयाचा करा मनी विचार।
निजी आहे सत्य नसे असत्य।
वाल्मिक मुनिचे कृत्य कथिले भविष्य स्वत:नं।

 या प्रश्नाला उत्तर देताना हैबती म्हणतो,

लंकापति रावण वधिला पहा श्रीरामानी।
ही रामायणी कथा असे कथिली वाल्मिकानी।
सीता सह निर्जर बंदीचे सोडवले त्यांनी।
बह्मा शिव आदि करून सुवेळा स्थानी।
दिव्य सीतेने घ्यावे ऐसे सर्वांचे वदनी॥१॥
चेतवून महा अग्नि टाकिली उडी कुंडामाजी।
निघे अग्नितून तेव्हा पडतो आप शब्दांची मांजी।
इंद्र चंद्र साक्षीस कोयी तेहतीस त्या समाजी
धन्य धन्य ते सीता माय म्हणती सर्व नामाजी
चार चंद्र त्या वेळी जमले असे ग्रंथ कथनी॥
रामचंद्र तो एक, सीता मुखचंद्र दुजा जाण।
शिव मस्तकी तिजा, अत्रीनंदन चवथा जाण।

 शाहिरांनी भोदिके रचली; पण संताच्या तोडीची प्रतिभासंपन्न रचना लावणीत कमी प्रमाणात आहे. संतांचे कूटही प्रभावी जाणवते. ज्ञानेश्वरांच्या रचनेवरून ते लक्षात येते.
लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ ४० ॥