पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१४३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१३७)

विशाल होतील.
 पण असूयेप्रमाणेच याही बाबतीत या पंडिताचे मत बरोबर नाही असे म्हणावे लागते. वर दाखविल्याप्रमाणे व्यक्तीच्या व समाजाच्या काही इच्छा परस्परविरोधी असल्या तरी मानवाचे मन विशाल होण्याच्या मार्गात गृहसंस्था आड येईल हे मत अगदी निखालस चुकीचे आहे असे वाटते. आणि उलट प्रेम, दया, स्वार्थत्याग यांचे संस्कार त्याच्या मनावर करण्यास गृह हे एकमेव साधन आहे, हेच खरे वाटते. पुत्र, कन्या, बहीण, भाऊ, पति-पत्नी ही नात्याची माणसे नसतील तर मानवाच्या मनाची वाढ होण्याचे बाजूलाच राहून ते अगदी निरुत्साह, निराश व कर्तृत्वशून्य होईल. स्त्री-पुत्र या प्रेरक शक्ती नसताना केवळ समाजासाठी मनुष्य अहोरात्र उद्योग करील. ही कल्पना अगदी भ्रामक आहे. अनन्यसामान्य प्रेमाचे प्रकार अनेक असतात पति-पत्नीचे प्रेम हा त्याचा निःसंशय एकमेव श्रेष्ठ प्रकार होय. पण मातापिता, पुत्रकन्या, बंधुभगिनी यांच्या प्रेमात या श्रेष्ठ प्रेमाचा भाग असतोच असतो. आणि म्हणूनच ही मंडळी एकत्र राहू शकतात. हा सुवर्णांश जसजसा कमी होत जातो (आणि पुत्र, कन्या, बंधुभगिनी यांच्या बाबतीत तसे होणे अगदी वाजवी आहे) तसतशा त्या व्यक्ती दुरावतात. पण गृहसंस्था ही जी उभारली जाते ती अनन्यसामान्य प्रेम या तत्त्वावरच उभारली जाते. अपत्यांचे संगोपन हे तिचे मुख्य कार्य होय हे खरे; पण ते याच तत्त्वावर झाले पाहिजे आणि होत असते. गृहसंस्थेच्या अभावी अपत्यांचे संगोपन होणार नाही असे नाही. वैद्यकीय दृष्ट्या कदाचित् जास्त चांगले होईल. पण रसेलने म्हटल्याप्रमाणे (मॅरेज अँड मॉरल्स् पृ. ३००) ते अगदी निष्प्रेम होईल आणि त्यात अगदी उद्वेगजनक एकरूपता येईल. मुलाच्या मनाच्या वाढीला व ते आनंदी, निर्भय आणि विशाल व्हावे यासाठी प्रेमळ वातावरणाची आवश्यकता असते आणि ते आईबापावाचून अन्यत्र मिळणे अशक्य आहे असेही त्यानेच म्हटले आहे. (पृ. १९४) तो माझा, मी त्याचा व इतर कुणाचा नव्हे एवढया भावना पिता-पुत्रांच्या प्रेमाला अवश्य आहेत. (याच बाबतीत जास्त चर्चा अपत्य संगोपन प्रकरणी पहावी.)
 मी, माझी पत्नी, माझी अपत्ये ही भिन्नतेची भावना मानवाच्या मनाला फार पोषक आहे. शाळेच्या लहानशा जगातही हिचा परिणाम