पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१७७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१७१)

 रशियांतील ही व्यवस्था उत्तम आहे हे खरे; पण त्याबरोबरच असे लक्षात ठेवले पाहिजे की जोपर्यंत ही व्यवस्था समाजाने केली नाही, तोपर्यंत विवाहित स्त्रीने द्रव्यार्जनाच्या फंदात पडणे सर्वस्वी घातुक ठरेल. दुर्दैवाने ज्या हजारो स्त्रियांना ही दुहेरी जबाबदारी संभाळणे भाग आहे, त्यांची स्थिती अत्यंत शोचनीय झालेली आपण पाहातोच. तेव्हा ज्यांना द्रव्यार्जन न करूनही भागण्याजोगे आहे. त्यांनी ते करू नये, हेच त्यांच्या व अपत्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने युक्त आहे
 प्रत्येक दंपतीला किती अपत्ये असावी ह्या प्रश्नालाही कौटुंबिक सुखाच्या दृष्टीने फार महत्त्व आहे. पंधरा ते पंचेचाळीस या वयात जितकी अपत्ये होणे शक्य आहेत तितकी होऊ द्यावी, हा 'नैसर्गिक निवड' या पक्षाचा आग्रह कसा घातुक आहे हे मागे लोकसंख्येचा वाढीचा व नियमनाचा विचार केला तेव्हा दाखविलेच आहे. आहे हीच लोकसंख्या टिकवून धरण्यासाठी (कित्येक देशात तीही जरूर नाही.) प्रत्येक दंपतीला दोन तरी अपत्ये असणे अवश्य आहे. ही दोन्ही तारुण्यात येऊन स्वतः दोन अपत्ये निर्माण करीपर्यंत जगतीलच अशी खात्री नसल्यामुळे आणखी अपत्ये होणे इष्ट आहे या सर्वांचा हिशेब करून प्रत्येक दंपतीला चार तरी अपत्ये असावीत असे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. ग्रोटजेन या जर्मन अभ्यासकाने चालू लोकसंख्या टिकवून धरण्यास सरासरी ३.८ अपत्ये कुटुंबामागे असावीत असे म्हटले आहे. पण संख्या फार मोठी आहे, वास्तविक २.५ च्या वर सरासरी आकडा असण्याची जरूर नाही, असे हॅवलॉक एलिसने आपले मत दिले आहे. (व्हिदर मनकाइंड पृ. २२३)
 प्रत्येक दंपतीला सरासरी चार अपत्ये असावी असे लिओनार्ड डार्विनने मत आहे. मानसशास्त्राच्या दृष्टीने विचार करून चार ते पाच मुले असावीत असे मॅक्डुगलने मत दिले आहे. त्याच्या मताने अशी थोड्या थोड्या वयाच्या अंतराची मुले एकाच घरात असल्याने बालकांच्या मनाची वाढ होण्यास फार सुकर होते हे आणि मागे सांगितलेले विचार घ्यानांत घेतले तर चार-पाच मुलांपलीकडे जास्त मुले होणे इष्ट नाही, हे ध्यानात येईल. मुलांचे आरोग्य व आईचे सुख या दोन्ही दृष्टीने हीच मर्यादा चांगली आहे. आणि हे मान्य केल्यास संततिनियमनाचे व अपत्यसंगोपनाचे शिक्षण प्रत्येक स्त्रीला देणे अत्यंत अवश्य आहे हे मान्य करणे ओघानेच प्राप्त होते.