पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१७८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१७२)

 विवाहसंस्थेच्या मूलतत्त्वांचा व वैवाहिक जीवनाचा इतक्या अनेक अंगांनी विचार केल्यानंतर सध्या आपल्या समाजांत विवाहाच्या बाबतीत प्रचलित असलेल्या एका महत्त्वाच्या रूढीचा विचार करणं अस्थानी होणार नाही. सगोत्रविवाहनिषेध ही ती रूढी होय.
 आज दोन हजार वर्षे दिदु समाजाने सगोत्रविवाह हा अत्यंत निषिद्ध मानलेला आहे. असा विवाह केला तर ती स्त्री चांडाळी व तिचा पुत्र हा चांडाळ होतो असा काही स्मृतिकारांचा अभिप्राय आहे. सगोत्र स्त्रीशी विवाह करणे हे गुरुतल्पंगमनाइतकं नीचपणाचे कृत्य आहे असे धर्मपंडितांचे सांगणे आहे. तेव्हा ते खरे आहे किंवा काय याचा आपणास विचार केला पाहिजे.
 सगोत्र विवाह करू नये असे म्हणणाराचे मत पुढीलप्रमाणे आहे. क ख ह्या दोन व्यक्तींचे गोत्र एकच (उदा. शांडिल्य) आहे असे समजू. आता शास्त्रकारांच्या मते याचा अर्थ असा आहे की या दोन व्यक्तींची कुले सध्या एकमेकांस कितीही अपरिचित व कितीही दूरची अशी असली तरी त्या दोन व्यक्तींचे लांबचे पूर्वज एकाच कुळात जन्मलेले असले पाहिजेत. गोत्र शांडिल्य आहे, याचा अर्थच हा की शांडिल्य हा त्या दोघांचा एकच पूर्वज होता. आणि ज्या दोन व्यक्तींचे पूर्वज एक आहेत त्यांनी आपापसांत रक्तसंबंध करणे, हे प्रजेच्या दृष्टीने अगदी घातुक आहे.
 सगोत्राप्रमाणेच आणखीही काही गोत्रांचे आपापसातले विवाह निषिद्ध मानलेले आहेत. जामदग्रंथ व वत्स, बाभ्रक आणि कौशिक, वासिष्ठ आणि कौंडिण्य इत्यादी जोड्या प्रसिद्धच आहेत. (कौशिक गोत्री यांनी कौशिक गोत्रियांशी लग्न नाहीच करावयाचे. पण बाभ्रक गोत्रियाशीही करावयाचे नाही. या दोन गोत्रांचे आपापसांत जमत नाही असे व्यवहारांत म्हणतात. सगोत्र विवाहाच्या निषेधाला जे कारण आहे तेच कारण येथे आहे.) ज्या दोन गोत्रांचे जमत नाही, असे सांगितलेले असते त्या दोन्ही गोत्रांचे प्रवर एक असतात. तीन प्रवरांपैकी निदान एक तरी प्रवर सारखा असतो. आणि प्रवर याचा रूढ अर्थ ह्या कुळांतील पूर्वज असा असल्यामुळे जी सगोत्राची अडचण तीच सप्रवरांना येते.
 सगोत्राप्रमाणेच सपिंडविवाहाचाही शास्त्रकार निषेध करतात. बापाकडून सात पिढया व आईकडून पाच पिढ्या जे सपिंड असतील, त्याचे